विनाकारण प्रवास केल्यास दहा हजारांचा दंड !

जळगाव प्रतिनिधी । ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये अकारण प्रवास करण्याला बंदी घालण्यात आली असून यासाठी तब्बल १० हजारांच्या दंडाची आकारणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ब्रेक द चेन अंतर्गत शासनाने जाहिर केलेल्या नियमावलीनुसार अत्यावश्यक व टाळता न येण्याजोगा प्रवासा व्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणांसाठी प्रवास करण्याची मुभा नाही. त्यासाठी परवानगी पास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित केला जात नाही. नियमावलीत नमूद कारणांशिवाय व नियमावलीत नमूद नियमांचे पालन न करता केलेला प्रवास हा दहा हजार रुपयांपर्यंतचा दंडनीय अपराध असून याची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात पथके कार्यरत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

ब्रेक द चेन संदर्भातील नियमावलीची अंमलबजावणी जळगाव जिल्ह्यात 22 एप्रिल रोजी रात्री आठ वाजेपासून अंमलात येणार आहे असून ती 1 मे 2021 रोजी सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहणार आहे. नियमावलीत नमूद केल्याप्रमाणे आंतरजिल्हा अथवा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक व टाळता न येण्याजोगा प्रवास जसे वैद्यकीय उपचार, कुटुंबातील व्यक्तीचे अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी अथवा जीवनावश्यक सेवा पुरवणे यासाठीच मर्यादित आहे. या कारणांसाठी करावयाच्या प्रवाशाला कुठल्याही परवानगी/पासची आवश्यकता नाही असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

Protected Content