जिल्ह्यात आजपासून कोविड १९ रुग्ण शोध मोहीम

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा Covid 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रासह महानगरपालिका नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या क्षेत्रात आजपासून रूग्ण शोध मोहिम सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली आहे.

बुधवार २४ मार्च २०२१ पासून माझे कुटुंब- माझी जबाबदारी मोहिमेच्या धर्तीवर Covid 19 रुग्ण शोध मोहीम आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी या शोध मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटले आहे, जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन सर्वंकष प्रयत्न करीत आहे. तसेच तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, ऑक्सिजनयुक्त बेड कार्यान्वित करण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूबाधित रुग्णांचा शोध लवकरच होवून त्यांना वेळेत औषधोपचार उपलब्ध व्हावेत म्हणून माझे कुटुंब- माझी जबाबदारी या महत्वाकांक्षी मोहिमेच्या धर्तीवर बुधवारपासून कोविड १९ शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत नागरिकांची माहिती, वय, तापमान, ऑक्सिजनची पातळी, सहव्याधी रुग्ण असल्यास त्याची माहिती, लसीकरण झाले किंवा नाही, कोविड १९ संशयित असलेल्या रुग्णाचे ठिकाण आदी माहिती संकलित केली जाणार आहे.

या मोहिमेमुळे कोरोनाबाधित रुग्णांचा शोध लागून त्यांच्यावर तातडीने औषधोपचार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणूबाधित रुग्णांवर वेळेत औषधोपचार होवून मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरी येणार्‍या आरोग्य विभागाच्या पथकांना खरी माहिती देवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

या शोध मोहिमेस लोकप्रतिनिधी, सरपंच, पोलिसपाटील, तलाठी, ग्रामसेवकांसह स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहकार्य करणार आहेत, असेही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटले आहे.जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा प्रकोप वाढीस लागलेला असला तरी बरे होणार्‍या रूग्णांचे प्रमाण देखील लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे. ज्या तालुक्यांमध्ये रूग्णसंख्या वाढली आहे तेथे जनता कर्फ्यूसारख्या उपाययोजना करण्यात येत आहेत. या पाठोपाठ आता रूग्ण तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे.जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांना आता जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावे ही अपेक्षा आहे. असे झाल्यास आपण कोरोना विरूध्दची लढाई जिंकू शकतो.

Protected Content