जळगाव प्रतिनिधी । बीएचआर सहकारी पतसंस्था घोटाळ्यातील प्रमुख संशयित सुनील झंवरने पुण्याच्या विशेष न्यायालयालात शरण येत आपले वॉरंट रद्द केले. तर, अवसायक जितेंद्र कंडारे याने अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवरला दोन मार्चला मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून बचावासाठी १५ दिवसांचा दिलासा दिला होता. तर दुसरीकडे पुण्याच्या न्यायालयाने झंवर व कंडारे यांना फरार घोषित करण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी घोषणापत्र जारी केले होते. या घोषणापत्रानुसार ३० दिवसांच्या आत म्हणजेच १४ मार्चपर्यंत दोघांना न्यायालय, पोलिसांना शरण येण्याचे वॉरंट काढले होते. या वॉरंटची मुदत येणार्या आठवड्यात संपुष्टात आल्यानंतर दोघांना फरार घोषित करण्यात येणार होते, असे झाल्यास त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठीची कार्यवाही सुरू झाली असती. यामुळे झंवर याने पाच मार्च रोजी पुण्याच्या न्यायालयात स्वत: हजर राहून वॉरंट रद्द करून घेतले. झंवर याला १७ मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, दुसरा प्रमुख संशयित अवसायक जितेंद्र कंडारेविरुद्धदेखील फरार संदर्भात घोषणापत्र जारी केले आहे. त्याला १४ मार्चपर्यंत न्यायालय, पोलिसांना शरण येण्याचे वॉरंट काढलेले आहे. तत्पूर्वी कंडारे याने पुणे न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यावर १२ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.