खासदारानं निलंबित करणं चांगली गोष्ट आहे का?- शरद पवार

नवी दिल्ली-वृत्तसेवा | संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान 141 खासदारांना निलंबित केलं गेलं आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राजधानी दिल्लीत संसदभवन परिसरात विरोधकांनी आंदोलन केलं. संसदेपासून विजय चौकापर्यंत विरोधी पक्षातील खासदारांनी मोर्चा काढला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आक्रमक होत आपली भूमिका मांडली आहे. जनता सगळं पाहते आहे. जनता या सगळ्यांना धडा शिकवेल. जनता सारं सूद समेत वसूल करेल, असं शरद पवार म्हणालेत. 13 डिसेंबर रोजी लोकसभेत गोंधळ झाला. त्याबाबतही शरद पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच निलंबनाच्या कारवाईवरही शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संसदेत जो गोंधळ झाला ते लोक सभागृहाचे सदस्य नव्हते. मग ते सभागृहात कसे आले. ते खासदाराच्या पासवर लोकसभेत आले होते. याबाबत सरकारकडून कोणतही स्टेटमेंट येण गरजेचं होतं. पण ते आलं नाही. विरोधी पक्षातील लोकांनी त्याबाबत स्पष्टीकरण मागितलं. पण ते दिलं गेलं नाही. याबाबत प्रश्न विचारले तर खासदारांना निलंबित केलं गेलं. हे अत्यंत चूक आहे, असं शरद पवार म्हणाले.

विरोधी पक्षांचीही काही जबाबदारी असते. तीच जबाबदारी पार पाडत असताना खासदारांना निलंबित केलं गेलं. देशाची जनता हे सारं पाहत आहे. या सगळ्याची किंमत जनता वसूल करेन, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

संसदेतून खासदारांना निलंबित केल्यानंतर विरोधी पक्षातील खासदारांनी अंदोलन केलं. यावेळी कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींची मिमिक्री केली. याचा व्हीडिओ राहुल गांधी यांनी शूट केला. यावरून बरीच टीका झाली. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही योग्य गोष्ट आहे. ते लोकसभेच्या सभागृहात नव्हते. सभागृहाच्या बाहेर काही झालं. यावर चर्चा होऊ शकते. मात्र राहुल गांधी यांनी जो व्हीडिओ शूट केला ती घटना सभागृहातला नव्हती. ते सगळं सभागृहाबाहेर झालं होतं. त्यामुळे त्यावर आक्षेप घेण्याचं काम नाही, असं शरद पवार म्हणालेत.

Protected Content