मराठी साहित्य संमेलन समित्या निवडीसाठी नावे पाठविण्याचे आवाहन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पहिल्या टप्प्यातील विविध समित्यांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील समित्यांचे गठन करण्यात येत आहे. या संमेलनासाठी ज्यांना आपले सहकार्य व योगदान द्यावयाचे आहे, अश्या साहित्यप्रेमींनी आपले नाव आठ दिवसांच्या आत कळविण्याचे आवाहन म.वा.मंडळातर्फे करण्यात आले आहे.

अमळनेर येथे संमेलनाच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर मराठी वाङ्‌मय मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी यांनी विविध समित्यांची घोषणा नुकतीच केली आहे. यात, निधी संकलन समिती, ग्रंथ प्रदर्शन समिती (गाळे व्यवस्थापन), विविध शासकीय परवानगी समिती, शाळा महाविद्यालय समन्वय समिती, कार्यालय समिती, हिशोब लेखन व लेखापरीक्षण समिती, कवी कट्टा समिती, सांस्कृतिक समिती, बालमेळावा व नाटय समिती, प्रसिध्दी व माध्यम समिती, प्रतिनिधी नोंदणी समिती, विविध कार्यशाळा समिती, निवास व्यवस्था समिती, मदत कक्ष समिती, समन्वय समिती, ग्रंथ दिंडी समिती, स्वच्छता समिती, स्मरणिका समिती या समित्यांमधील काही सदस्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

दुसऱ्या टप्प्यात अन्य सदस्यांचा या समित्यांमध्ये समावेश करण्यात येणार आहे तसेच अन्य काही समित्यांचे देखील गठन करण्यात येणार आहे. यासाठी समित्यांमध्ये काम करु इच्छिणाऱ्यांकडून नावे मागविण्यात येत आहेत. या संमेलनासाठी ज्यांना आपले सहकार्य व योगदान द्यावयाचे आहे, अश्या साहित्यप्रेमींनी आपले पूर्ण नांव, गांव, पत्ता आठवडाभरात अध्यक्ष, मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर या नावाने आठ दिवसांच्या आत लेखी कळवावे अथवा प्रा.डॉ. सुरेश माहेश्वरी यांच्या ८८०६७१११९९ किंवा भैय्यासाहेब मगर ९४२३९०४४८३ या व्हॉटस्अॅपवर क्रमांकावर कळवावे. तसेच प्रतिनिधी नोंदणी, ग्रंथदालन नोंदणी, बालमेळावा नोंदणी, कवीकट्टा नोंदणी, गझलकट्टा नोंदणी, टेंडर प्रक्रिया आदी माहितीसाठी www.marathisahityasammelan.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन म.वा.मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Protected Content