लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमध्ये मात्र प्रचाराला आलेल्या भाजप उमेदवाराला नागरिकांनी मागील पाच वर्षांत केलेल्या कामाचा हिशोब मागितला. जनतेचा रोष पाहत या उमेदवाराला गावातून पळून यावे लागले.
युपीतील सलेमपूर लोकसभा मतदार संघातून २०१४ ला भाजपकडून निवडून आलेले खासदार रविंद्र कुशवाहा यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. रविंद्र कुशवाहा हे आपल्या मतदारसंघात प्रचाराला गेले असताना त्यांना नागरिकांच्या रोषाला समोर जावे लागले. मागील पाच वर्षांत तुम्ही किती काम केले असा जाब नागरिकांनी विचारला. नागरिकांचा रोष लक्षात घेत कुशवाहा यांनी गाडीतून न उतरताच परतावे लागले.
कुशवाहा गावात येताच लोकांनी त्यांची गाडी अडवत जाब विचारायला सुरुवात केली. लोकांच्या प्रश्नाला उत्तर देत संतप्त खासदार महोदयांनी लोकांना तुमचे मतदान नको असे सांगितले. कुशवाहा यांच्या संतप्त भूमिकेमुळे गावकऱ्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. गावकऱ्यांचा संताप लक्षात घेत कुशवाहा आणि त्यांच्यासोबत असलेल्या स्थानिक आमदाराने लोकांना समजावण्यासाठी गाडीतून उतरत असतानाच लोकांनी त्यांनाही विरोध केला.