तिसऱ्या टप्प्यात देशात ६३.२४ तर राज्यात सरासरी ५५.०५ टक्के मतदान

general elections 2019 a 660 041119085104

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रासह १५ राज्यात किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. १५ राज्यातील ११७ जागांवर सरासरी ६३.२४ टक्के मतदान झाले तर महाराष्ट्रात मात्र ५५.०५ टक्के एवढेच मतदान झाले. देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७९ टक्के तर जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात कमी १२.४६ टक्के मतदान झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

 

आज सकाळपासूनच १५ राज्यात मतदान प्रक्रिया सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सपा नेते अखिलेश यादव, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांच्यासह अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावून मतदान केलं. यावेळी महिलांनी मतदानात सर्वाधिक भाग घेतला होता. गुजरातमध्ये गीरच्या जंगलात केवळ एका मतदारासाठी मतदान केंद्र बनिवण्यात आले होते. भारतदास बापू असे या मतदाराचे नाव असून त्याने मतदानात भाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला.

गावठी बॉम्बचा स्फोट:- पश्चिम बंगालच्या मुर्शीदाबादमधील राणीनगर मतदान केंद्राजवळ अनोळखी व्यक्तींनी आज गावठी बॉम्बचा स्फोट घडवून आणला. यात तृणमूल काँग्रेसचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. या स्फोटानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्र बंद केले होते.
काँग्रेस-तृणमूल हाणामारीत मतदाराचा मृत्यू:- मुर्शीदाबादमधील बलिग्राममधील मतदान केंद्राबाहेर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यात मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका मतदाराचा मृत्यू झाला.

काश्मीरमध्ये हिंसाचार:- जम्मू-काश्मीरच्या बिजबेहर येथे मतदान सुरू असताना पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स कार्यकर्त्यात हाणामारी झाली. बोगस मतदान करणाऱ्यांना रोखले म्हणून पीडीपीच्या कार्यकर्त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या पोलिंग एजंटला बेदम मारहाण केली. मात्र हा पोलिंग एजंट महिलांशी असभ्यपणे वागल्यानेच आम्ही त्याला मारहाण केली, असे पीडीपीचे म्हणणे आहे.

गुजरात केरळमध्ये मतदान पूर्ण:- गुजरातमध्ये सर्वच्या सर्व २६ तर केरळमध्ये २० जागांवर आज मतदान पूर्ण झाले, मोदींनी गांधीनगरमध्ये मतदान केलं. गुजरातमध्ये सरासरी ५८.८१ टक्के तर केरळात ६८.६२ टक्के मतदान झाले आहे. गुजरातमध्ये गांधीनगर येथून भाजपचे अध्यक्ष अमित शहा तर केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी उभे आहेत. याशिवाय भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले, स्वाभिमानीचे राजू शेट्टी, समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव, भाजपचे वरुण गांधी, भाजप नेत्या जयाप्रदा आदींचे भवितव्यही आज मतपेटीत बंद झाले आहे. २३ मे रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

आतापर्यंत ३०२ जागांवर मतदान:- लोकसभेच्या एकूण ५४५ जागांपैकी आतापर्यंत ३०२ जागांवर मतदान पार पडलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ९१ जागांवर ६९. ५ टक्के मतदान झालं होतं. दुसऱ्या टप्प्यात ९५ जागांवर ६९.४४ टक्के मतदान झालं होतं. तर तिसऱ्या टप्प्यात ११७ जागांवर ६३.२४ टक्के मतदान झालं आहे.

राज्यनिहाय मतदानाची टक्केवारी :-
– महाराष्ट्र : ५५.०५ टक्के
– आसाम : ७४.०५ टक्के
– बिहार : ५४.९५ टक्के
– छत्तीसगड : ६४.०३ टक्के
– दादरा व नगर हवेली : ७१.४३ टक्के
– दमण व दीव : ६५.३४ टक्के
– गोवा : ७०.९६ टक्के
– गुजरात : ५८.८१ टक्के
– जम्मू-काश्मीर : १२.४६ टक्के
– कर्नाटक : ६०.८७ टक्के
– केरळ : ६८.६२ टक्के
– ओडिशा : ५७.८४ टक्के
– त्रिपुरा : ७१.१३ टक्के
– उत्तर प्रदेश : ५६.३६ टक्के
– पश्चिम बंगाल : ७९

Add Comment

Protected Content