पशुधन चोरीच्या निषेधार्थ आ.चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचगव्हाण व दहिवद परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चिंचगव्हाण येथील एका शेतकऱ्याचे तब्बल ३५ शेळ्या चोरीला गेल्याने आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.                            

चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या गायी, बैल, शेळ्या व म्हशी आदी पशुधन चोरीला जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यात चिंचगव्हाण येथील गोविंदा मोतीराम पाटील या शेतकऱ्याच्या तब्बल ३५ शेळया एकाच रात्रीत चोरट्यांनी चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्या शेतकऱ्यांनी याबाबत गुन्हा दाखल करूनही तपास लागत नसल्याने शेवटी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांनी चिंचगव्हाण फाट्यावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी गेल्यावर्षी देखील आडगाव येथील एकाच शेतकऱ्याच्या खुंट्यावरील सर्व जनावरे चोरीला गेल्याने त्यांनी रास्ता रोको केला होता. त्या जणावरांचा हल्ली तपास नाही. दरम्यान धुळे रोड परिसरातील गावांमध्ये देखील या घटना वाढल्या आहेत. चोरीचे प्रमाणच एवढे वाढले आहे की, आतापर्यंत मेहूणबारे पोलिस स्थानकात २७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्हाचे तपास करून एकाही चोरट्याला पोलिसांनी अद्यापपर्यंत अटक केलेली नाही. त्यामुळे पोलिसांचे या चोरांना पाठबळ आहे का? अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक शेतकऱ्यांनी यावेळी केले.

दहशत पोलिसांची चोरांवर असायला हवे परंतु मेहुणबारे पोलीस स्थानकाच्या हद्दीत चोरांची जनतेवर दहशत निर्माण झाली आहे. पोटाच्या पोराप्रमाणे शेतकरी आपल्या जनावरांचा संगोपन करीत असतो. मात्र  लाखोंच्या किंमतीची जनावरे चोरीला जात असल्याने त्यांचे जगणेच असाह्य झाले आहे. त्यामुळे येत्या १५ दिवसात जनावरे चोरणाऱ्या टोळीचा तपास पोलिसांनी न लावल्यास पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचा इशारा आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या निष्काळजीपणा मुळेच चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले. गोविंदा मोतीराम पाटील, अण्णा वामन सोनवणे, कैलास भास्कर निकम, भास्कर सोनवणे, मोईनूद्दीन शेख, प्रा.सुनील निकम, पियुष साळुंखे, सुभाष राठोड यांच्यासह जनावरे चोरी गेलेल्या शेतकऱ्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्याशी फोनद्वारे संपर्क करून याबाबतीत चर्चा केली. त्यावर मेहूणबारे पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी लवकरात लवकर चोरी करनाऱ्या टोळीचा तपास पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन स्थगित केले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, पंचायत समिती सदस्य पियुष साळुंखे, चिंचगव्हाणचे सरपंच सुभाष राठोड, विनोद भोला पाटील, कैलास हिम्मत पाटील, खडकीसिम येथील भोला पाटील, लोंढे येथील सुनील चौधरी, मेहुणबारे येथील राजू शेख, गौतम चव्हाण, दहीवद येथील कल्याण खलाणे, आबा करंकाळ, अक्षय निकम, सोनू पाटील, शरद पाटील, मच्छीन्द्र पाटील, सुनील पाटील, गजमल वाघ, सुरेश वाघ, जिभाऊ पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content