मी जड अंत:करणाने पक्ष बदलला आहे; शिंदे गटात गेलेल्या वायकरांचे खळबळजनक विधान

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मी जड अंत:करणाने पक्ष बदलला आहे. मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले. त्यानंतर माझ्यासामोर तुरूंगात जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय होते, दबाव तर होताच, परंतु पत्नीचेही नाव गोवले गेल्यावर माझ्यापुढे पर्याय नव्हता.नियतीने अशी वेळी कोणावरही आणू नये, असे खळबळजनक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी केले. त्यामुळे रवींद्र वायकर लोकसभेची निवडणूक किती इर्ष्येने लढतील, याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वायकर हे शरीराने जरी शिंदे गटात असले तरी ते मनाने ठाकरे गटातच आहे अशी चर्चा राजकीय वर्तूळात घडली आहे.
रवींद्र वायकर यांनी स्पष्टपणे दबाव असल्यामुळेच आपण शिंदे गटात प्रवेश केल्याची कबुली दिली आहे. यामुळे आता एकनाथ शिंदे यांची गोची होऊ शकते. लोकसभेची उमेदवारी दिलेला नेता आपल्याला दबावाखाली शिंदे गटात प्रवेश करावा लागला, असे म्हणत असेल तर विरोधकांच्या दाव्याला बळ मिळू शकते. ईडी आणि सीबीआयचा वापर करुन विरोधी पक्षातील नेत्यांना भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी भाग पाडले जात आहे, असा आरोप वारंवार विरोधक करतात. आता मुंबईतील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रवींद्र वायकर यांच्या वक्तव्याचे भांडवल करुन विरोधक भाजप आणि शिंदे गटाविरोधात वातावरणनिर्मिती करतात का हे बघावे लागेल.

Protected Content