हॉली डे रेल्वे गाडी नियमित करावी – मंत्री अनिल पाटील

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा ।  अमळनेर रेल्वेस्थानकाच्या सुधारणा संबंधित उपाययोजना तसेच  विशेष रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा या व इतर मागण्यांसाठी मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांनी रेल्वेराज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

अमळनेर तालुका हा जळगाव जिल्ह्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे.अमळनेर शहराला धार्मिक व आध्यात्मिक महत्व असून प.पु.सखाराम महाराज्यांच्या पदस्पर्शामुळे प्रतिपंढरपूर अशी ओळख निर्माण झाली आहे. सोबतच देशातील प्रसिद्ध व एकमेव मंगळग्रह मंदिर अमळनेरात आहे. त्यादृष्टीने मोठ्या प्रमाणात भाविकांची अमळनेरात मांदियाळी असते. त्यांच्या दळणवळणाच्या दृष्टीने रेल्वेचा पर्याय सोयीस्कर असल्याने स्थानकावर सुपर फास्ट रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा अशी विनंती यावेळी ना.अनिल पाटील यांनी केली.

भुसावळ मुंबई सेंट्रल(०९०५१) या ट्रेनला हॉलिडे स्पेशलचा दर्जा आहे त्यामुळे आठवड्यातून एकदाच ही ट्रेन अमळनेर रेल्वे स्थानकावर थांबत असून तिला दैनंदिन थांबा मिळावा तसेच प्रवासाची वेळ कमी करून मिळावी. पुणे-नंदुरबार(व्हाया भुसावळ-जळगाव-अमळनेर) अशी रेल्वे सुरू करावी.अमळनेर येथून शिक्षण तसेच इतर कारणास्तव पुण्याला ये जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असून या भागातुन ४०० पेक्षा जास्त लक्झरी बसेस जात असल्याने रेल्वेगाडीला चांगला प्रतिसाद मिळू शकतो.

अमळनेर रेल्वे स्थानकावरील दोन्ही प्लॅटफॉर्म एकमेकांना झिग-झ्याग असून प्रवाशांच्या दृष्टिकोनातून योग्य नसल्याने त्यांना समांतर करण्यात यावे. अमृत भारत योजनेअंतर्गत अमळनेर स्थानकाला अत्याधुनिक सोयीसुविधा मिळाव्यात तसेच इतर मागण्यांसाठी ना.अनिल पाटील यांच्याकडून ना.रावसाहेब दानवे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Protected Content