पाचोरा, प्रतिनिधी | शहरासह परिसरात काल आणि आज पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात तर आज रविवार असल्याने बाजारपेठेत शांतता होती, मात्र रविवारी सुटीचा दिवस असल्याने पाऊस सुरू होताच अनेकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या २० दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. यानंतर दोन दिवसांपासून पावसाने तालुक्यात पुन्हा हजेरी लावली आहे. काल शनिवारी रोजी झालेल्या पावसामुळे शहरातील रेल्वे भुयारी मार्गावर एक तास रस्ता बंद होता, पाणी साचल्याने आणि वीज गेल्याने येणे-जाणे अवघड झाले होते. बाहेरपुरा अशोक सम्राट नगर जवाहर हौसींग सोसायटीच्या आवारात गटारी स्वच्छ होत नसल्याने व गटारीवर अतिक्रमण झाल्याने सखल भागात पाणी साचले होते. लहान मोठे नाले नद्यांचा पूर आला होता.
उडीद-मुगाला फायदा :- पिकांना पाण्याची आवश्यकता सतत भासत असते. यातच उडीद आणि मुग फुलांवर आले असून, काही ठिकाणी शेंगा देखील लागल्या आहेत. यामुळे उडीद आणि मुगाला आता पाण्याची नितांत गरज होती. यामुळे बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला असून, या पावसाचा फायदा उडीद-मुगाला अधिक होणार आहे.