Home Cities अमळनेर अमळनेर तालुक्याला अतिवृष्टीचा फटका : अनेक गावांचा संपर्क तुटला !

अमळनेर तालुक्याला अतिवृष्टीचा फटका : अनेक गावांचा संपर्क तुटला !

0
344

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मारवड व भरवस मंडळात आज जोरदार अतिवृष्टी झाल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. तर या दोन्ही मंडळातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तालुक्यात जोरदार पाऊस झाला. जून महिन्यापासून पाऊस जेमतेम स्वरूपाचा होता. मध्यंतरी पावसाने ओढ दिल्याने मका, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद कापूस पिकांना फटका बसला आहे. मात्र पोळ्याला पावसाने पुन्हा एंट्री केल्याने पिकांना जीवदान मिळाले होते. मात्र आज झालेल्या वादळी वाऱ्यांसह पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने मारवड मंडळ, भरवस मंडळात अतिवृष्टी झाल्याने नाल्याना पूर आल्यामुळे काही गावाचा संपर्क तुटला होता.

या परिसरातील कळमसरे, नीम, वासरे, खेडी, मारवड, डांगरी, बोहरा परिसरातील फरशी पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला होता. तर वासरे, गावाला पाण्याचा वेढा पडल्याने गावात प्रत्येक गल्लीत पाणी वाहताना दिसून आले. भरवस येथील रेल्वे बोगद्यातून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पाडसे, खर्दे, चौबारी गावात पाण्यामुळे नुकसान झाले आहे. वादळ वारा असल्यामुळे वीज प्रवाह बंद झाला होता. मारवड, भरवस मंडळातील बऱ्याचसहा गावातील पिकांचे या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याचेही दिसून आले आहे. यंदा जून ,जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यात प्रथमच जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले जोरदार वाहू लागले आहेत.यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

दरम्यान या अतिवृष्टी सदृश पावसामुळे शेतीचीही मोठी हानी झाल्याचे वृत्त आहे. तथापि, याबाबत सकाळीच समजू शकणार आहे.


Protected Content

Play sound