युपीएससीतील यशवंत शुभम सरदार यांचा हृद्य सत्कार

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  संघ लोकसेवा आयोगाच्या केंद्रिय सुरक्षा सेवेच्या २०२२ च्या परिक्षेत दैदिप्यमान यशाचा मानकरी ठरलेला भुसावळ दीपनगर वसाहती मधील युवक शुभम सरदार याचा येथे सत्कार करण्यात आला.

 

शुभम मोहन सरदार याने साडेतीन लाख विद्यार्थ्यांमधून देशात १०७ वा तर अनुसूचित जाती मधून देशातून प्रथम येण्याचा मान मिळवला. त्याच्या या भरीव यशाने परिसरातून त्याच्यावर विविध संघटना व नागरिकांनी कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्युत अभियांत्रिकीमध्ये औरंगाबाद शासकीय  अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०१६ मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर दोन वर्षे अनुभवासाठी घरच्या कंपनीत नोकरी केली. २०१९ मध्ये संघ लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी सुरू केली तर २०२० मध्ये कोविड महामारीमुळे दिल्लीतील अभ्यासक्रम अर्धवट सोडून घरी यावे लागले त्यामुळे २०२० वर्ष वाया गेले. २०२१ मध्ये लेखी परीक्षा पास पण फिजिकल टेस्ट पार करता आली नाही.

 

दरम्यान, २०२२ मध्ये  लेखी परीक्षा देऊन संपूर्ण लक्ष्य फिजिकलवर केंद्रित केले. दीपनगर येथील मैदानावर दोन महिने कडक सराव केल्यावर २०२२ ची फिजीकल टेस्ट सहज पार केली. त्यानंतर मुख्य प्रश्न यूपीएससी मुलाखतीचा होता. त्यासाठी  कधी आरशा समोर बसून, ऑनलाईनवर, कधी बाबा घ्यायचे तर कधी बहीण मुलाखत घेत होती.

 

मुलाखत झाली आणि निवड होईल असा विश्वास बळावला, निकाल घोषित होऊन निवड झाली. खडतर परिश्रमाला आई, वडील, काका, आत्या, मामा यांचे प्रोत्साहन, खंबीर साथ यामुळेच हे यश संपादित झाले.

 

शुभम हा सामाजिक कार्य करणारे तथा भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रामध्ये सुरक्षितता अधिकारी म्हणून कार्यरत मोहन सरदार तथा आई सुनिता सरदार यांचा मुलगा असून वंचित बहुजन कंत्राटदार संघटनेचे प्रकाश सरदार व वैशाली सरदार यांनाचा पुतण्या आहे.

 

आता मसूरी (डेहराडून) येथे साधारणपणे ५२ आठवड्यांचे अतिशय खडतर असे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ६ महिने परिविक्षाधीन अधिकारी म्हणून सेवा बजावल्या नंतर देशात कोठेही पदस्थापना होईल. सध्या शुभम भुसावळ प्रकल्प६६० येथे मे. सरदार इंजिनियर्स अँड असोसिएट या कंपनीत साईट इंचार्ज म्हणून कार्यरत आहे. वडीलांच्या मानव सेवा ईश्वर सेवा  मार्फत सुरु असलेल्या सामाजिक / शैक्षणिक उपक्रमात तो आनंदाने सहभागी होऊन सामाजिक जबाबदारी पार पाडीत आहे.

 

धैय प्राप्ती साठी, आपण आपल्या धेयाच्याप्रती प्रामाणिक राहून, समाज काय म्हणेल याची पर्वा न करता चिकाटीने अभ्यासात सातत्य ठेवावे. आपल्या मेहनतीचे फळ मिळतेच मिळते. मला हे यश तीन वेळाचे अपयश पचवून मिळाले आहे. विद्यार्थी यांनी कोणत्याही कारणाने खचून न जाता  आपले धैयाकडे मार्गक्रमण सुरु ठेवा हेच माझ्या मित्रांना माझे सविनय  सांगणे आहे. असे शुभम सरदार यांनी केले आहे.

Protected Content