बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । काही दिवसांपासून मज्जिदवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यासंदर्भात चर्चा सुरु असतांना गेल्या वीस वर्षापासून कुठलाही गवगवा न करता बुलडाण्यातील शिवसेनेचे खासदार यांच्या हॉटेलवर ग्राहकांना मोफत हनुमान चालीसा पुस्तिका भेट दिली जात आहे.
प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचा प्रसार, प्रचार त्याचबरोबर पूजाअर्चा करण्याचे स्वातंत्र्य भारतीय घटनेने आपल्याला बहाल केले आहे. मात्र तो धर्म इतरांवर लादणे, किंवा त्यासंदर्भात राजकारण करणे हे कितपत योग्य आहे, याचा विचार करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून मज्जिदवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यासंदर्भात राज्यभर रणकंदन माजले आहे, मात्र धर्म हा दाखवण्याचा किंवा दुसऱ्यावर लादण्याचा विषय नसून तो एक आस्थेचा विषय आहे, आणि म्हणूनच गेल्या वीस वर्षापासून कुठलाही गवगवा न करता बुलडाण्यातील शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या हॉटेलवर ग्राहकांना मोफत हनुमान चालीसा पुस्तिका भेट दिली जात आहे.
बुलडाण्याचे शिवसेनेचे खासदार जाधव यांची मेहकर येथे परिवार नावाची हॉटेल आहे, या हॉटेलची स्थापना सुमारे वीस वर्षांपूर्वी करण्यात आली आणि तेव्हापासूनच या हॉटेलवर येणाऱ्या ग्राहकांना मोफत हनुमान चालीसा पुस्तिका देण्यात येत आहे. हॉटेलमध्ये सर्व जाती धर्माचे लोक येतात, मात्र हॉटेलकडून त्यांना आग्रहाने हनुमान चालीसा पुस्तक भेट दिली जात असून काही तर ती मागील १५ ते २० वर्षांपासून आपल्या पॉकेटमध्ये संभाळून ठेवलेय..
विविध ठिकाणावरून चहा, नाश्ता आणि जेवणासाठी येत असलेल्या प्रत्येक ग्राहकाला स्वच्छेने हि हनुमान चालीसा पुस्तिका मोफत भेट दिली जाते, हे अविरतपणे सुरू आहे. त्यामुळे हिंदुत्व हे मिरवण्याची गोष्ट नसून ते आम्ही आकलनात आणत असल्याचे त्या हॉटेल मालक सांगतात. हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा ही श्रीराम आणि मारुती वर आहे, मात्र त्याचा राजकारणासाठी वापर करण्यात येऊ नये, अशी प्रतिक्रिया देत आम्ही हॉटेलचे नियमित ग्राहक असून अनेक वर्षापासून हॉटेलवर हा उपक्रम सुरू आहे, त्यामुळे इतर राजकीय नेत्यांनी देखील धार्मिक राजकारण करू नये, उलट असे विविध उपक्रम राबवून आपल्या धर्माची जनजागृती देखील करता येते. असे ग्राहक सांगतात..
खरं तर कुणी कुठल्या धर्माचे अनुकरण करावे, हा ज्याचा त्याचा घटनात्मक अधिकार आहे, मात्र आपल्या धर्माचे राजकारण न करता, धर्माचा प्रचार आणि प्रसारासाठी सामाजिक उपक्रम राबविल्यास उत्तम ठरेल.