Home Cities जळगाव मारेकऱ्यांना फाशी द्या; रिंगणगावकरांचा आक्रोश मोर्चा !

मारेकऱ्यांना फाशी द्या; रिंगणगावकरांचा आक्रोश मोर्चा !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे १३ वर्षीय तेजस गजानन महाजन या मुलाच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आज शुक्रवारी रिंगणगावातील ग्रामस्थ आणि मयत मुलाच्या नातेवाईकांनी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. यावेळी नातेवाईकांनी “आरोपींना फाशी द्या.. तेजसला न्याय द्या” असा एकच आक्रोश करत मारेकऱ्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली.

तेजस महाजन याच्या हत्येमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयित आरोपींना अटक केली असली, तरी ग्रामस्थ आणि कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप कायम आहे. याच पार्श्वभूमीवर, आज सकाळी रिंगणगावातील मोठ्या संख्येने नागरिक आणि नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयावर जमले. त्यांनी हातात फलक घेऊन आणि घोषणाबाजी करत, तेजसला न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.

आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी मयत तेजसच्या नातेवाईकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली, आणि अश्रू ढाळत न्याय मिळण्याची मागणी केली. त्यांनी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनात, आरोपींना जलद गतीने शिक्षा व्हावी, या प्रकरणी योग्य तपास व्हावा आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

या आंदोलनात रिंगणगावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे त्यांच्यातील एकजूट आणि न्यायासाठीची तळमळ दिसून आली. या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने या प्रकरणी कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Protected Content

Play sound