अमळनेर (प्रतिनिधी) सानेगुरुजी कर्मभुमी स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने घेतल्या गेलेल्या अकराव्या युवा श्रमसंस्कार छावणीत तिसऱ्या दिवशी युवकांना विविध विषयातील तज्ञ व्यक्तींनी मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात शेखर सोनाळकर यांनी युवकांना मार्गदर्शन करतांना म्हटले की, गांधी, आंबेडकर, नेहरू यांच्या विचार समन्वयातूच देशाच्या समाजाच्या विकासाला चालना मिळू शकते.
दुसऱ्या सत्रात ‘बदलत्या वयातील जाण भान’ या विषयावर अभिव्यक्ती मिडिया संस्था व डाँ. रविंद्र जैन, भारती पाटील व डॉ. लिना चौधरी यांनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले मुलांमध्ये बदलत्या वयातील जाणभान निर्माण करण्याचा प्रयत्न पालकांनी सजगतेने व विवेकाने करायचा असतो.
दुपारच्या तिसऱ्या सत्रात सानेगुरुजी कर्मभुमी स्मारकाच्या कार्यवाह दर्शना पवार यांनी ‘लिंगभाव समानता’ (gender equality) या विषयावर मार्गदर्शन करतांना सुचवले की, लिंगभाव (gender)म्हणजे भुमिका(Roles)आहेत. या भूमिका पितृसत्ताकरूपी व्यवस्था चालवण्याचे काम करतात, म्हणून केवळ भुमिकांची अदलाबदल करण्यावर समाधान मानून चालणार नाही तर व्यवस्था बदलावी लागेल. महिलांनी स्वतःकडे माणुस म्हणून पाहिले पाहिजे. इतरांनीही त्यांचा माणुस म्हणून स्वीकार केला पाहिजे. घर, जमिन, शेती, वगैरे मालमत्तेवर स्रियांना समान अधिकार मिळायला हवा, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाग्येश पाटील व चेतन भोई यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत दिपक लांबोळे व चोपड्याचे प्रा.गौरव महाले यांनी केले.कार्यक्रमाला मनिषा चौधरी व लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रशांत सिंघवी व नीरज अग्रवाल, चंद्रभान पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.