हे तर शकुनी काकांच्या इशार्‍यावर चालणारे सरकार ! : आ. पडळकर

मुंबई प्रतिनिधी | जोवर राज्यात शकुनी काकांच्या इशार्‍यावर चालणारे सरकार आहे तोवर ओबीसी आरक्षण मिळणार नसल्याचे सांगत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला धक्का देत जाहीर झालेल्या निवडणुका स्थगित करायला नकार दिला आहे. यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे प्रस्थापितांच्या संपूर्ण नौटंकीचा बहुजनांपुढे पर्दाफाश झाला आहे. अध्यादेश काढण्यापूर्वी इम्पेरिकल डेटा गोळ करा आणि मगच अध्यादेश काढा, असे वारंवार सांगितले होते. पण प्रस्थापितांना आपल्या उमेदवारांसाठी मार्ग मोकळा करायचा होता आणि म्हणूनच त्यांनी नावापुरता अध्यादेश काढला, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

पडळकर पुढे म्हणाले की, सुरुवातीपासून प्रस्थापितांकडून ओबीसींचा पुळका असल्याचा आव आणला जात आहे. वेळ असताना जर आयोगाला बसायला खुर्ची दिली असती, मानधन दिले असते तर आता आमच्या बहुजनांचे हक्क हिरावले गेले नसते. आपला हक्क घेतल्याशिवाय मिळाणार नाही. जोपर्यंत शकुनी काकाच्या इशार्‍यावर हे प्रस्थापितांचे सरकार चालत आहे, तोपर्यंत हे फक्त असे दाखवण्यापुरते नाटक करून तोंडाला पाने पुसण्याचे काम करतील, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

Protected Content