अमळनेर (प्रतिनिधी) येथील आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी गुरुवार 4 एप्रिल रोजी त्यांना येत असलेल्या समस्यांबाबत त्यानी तक्रार केली होती. यानुसार आज दि 6 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेपासून ते चार वाजेपर्यंत प्रा. जयश्री साळुंके दाभाडे , प्रा. अर्जुन पावरा, प्रा. डॉ. रविंद्र पावरा, गृहपाल श्री बारेला , कर्मचारी आणि विद्यार्थी यांची आदिवासी मुलांच्या वस्तीगृहात बैठक घेण्यात आली. बैठकीत विध्यार्थ्यानी त्यांना असणाऱ्या समस्याबाबत रोखठोक भूमिका घेत पोटभर अन्न मिळत नसल्याने ठेकेदाराला बदल्यांची मागणी केली.
बैठकीपूर्वी संपूर्ण वस्तीगृहात फिरून अनेक गोष्टी निदर्शनास आल्या. या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊन विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी गृहपाल श्री बारेला यांच्या समक्ष मांडल्या. यात त्यांनी शासकीय नियमानुसार भोजन मिळत नाही, जेवण अपूर्ण बनविले जात असल्याने सर्व विध्यार्थ्याना पुरेसे होत नसल्याची तक्रार केली. तसेच चव रजिस्टरवर जबरदस्ती सह्या घेतल्या जातात. वस्ती गृहातील खोल्यांमध्ये विजेचे बोर्ड तुटलेल्या अवस्थेत आहेत. वसतीगृहातील अनेक खोल्यांमध्ये पंखे बंद आढळून आले. सर्व शौचालये, मोऱ्या अत्यन्त अस्वच्छ आढळून आले. स्वच्छता गृहांमध्ये डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळुन आले. संपूर्ण वसतिगृहात सर्वत्र अस्वच्छता दिसून आली आरोग्य तपासणी दर महिन्याला न होता एका वर्षाने झालेली (त्यांनी दिलेल्या आरोग्य फाईलनुसार) आढळली. आरोग्य फाईल मधील सर्व चार्ट कोरे आढळुन आले. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ठेकेदार तात्काळ बदलावा अशी मागणी करण्यात आली. सध्या मुलांच्या परीक्षा सुरू असून त्यांना पोटभर, पूर्ण व चविष्ट भोजन मिळावे आदी विषयाबद्दल चर्चा सकारात्मक करण्यात आली. या वसतिगृहातील समस्यांसंदर्भात प्रकल्प अधिकारी आणि नाशिक आदिवासी आयुक्त यांना निवेदन पाठविण्यात आले असून त्यांनी पंधरा दिवसात या विषयांवर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे