मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाला जबर धक्का बसला असून माजी मंत्री व माजी आमदारांसह मातब्बर नेत्यांनी आपल्या हजारो समर्थकांसह आज अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेतला. जिल्ह्यातील राजकारणावर याचे दूरगामी परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीला जळगाव जिल्ह्यात भोपळा देखील फोडता आला नाही. पक्षाचा एकही उमेदवार निवडून न आल्याने नैराश्याचे वातावरण पसरले. यातच अंतर्गत कलह उफाळून आल्याने या अडचणीत भर पडली. तर दुसरीकडे अजितदादा पवार यांच्या गटाला अमळनेरच्या स्वरूपात एक जागा मिळाली. दुसरीकडे अजितदादा पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने त्यांच्या गटाला जिल्ह्यात बळकटी मिळाली. यामुळे शरद पवार गटातील निष्ठावंत नेते हे अजितदादा पवार यांच्या सोबतीला जाणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. यावर तीन दिवसांपूर्वी शिक्कामोर्तब झाले होते.
जिल्हा बँकेत झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आपण 3 मे रोजी मुंबईत अजितदादा पवारांच्या गटात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले. याच बैठकीत माजी मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांनी मातब्बर नेत्यांची यादी वाचून दाखवत ही मंडळी आपल्या सोबत येणार असल्याचे जाहीर केले. तर माजी मंत्री डॉ. सतीशअण्णा पाटील यांनी देखील पारोळ्यात पत्रकारांशी बोलतांना शरद पवार गटाचा त्याग करणार असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, या पार्श्वभुमिवर आज मुंबईत आयोजीत भव्य कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांचा अजितदादा पवार गटात प्रवेश झाला. यात माजी मंत्री डॉ. सतीशअण्णा पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास गोरख पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार दिलीप सोनवणे, अमळनेर बाजार समितीच्या माजी सभापती तिलोत्तमा पाटील, शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आदींनी आपापल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी या मान्यवरांचे पक्षात स्वागत केले.
या प्रवेश सोहळ्याला जिल्ह्यातून आ. अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार व उमेश नेमाडे, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. विविध मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
एकाच वेळी तब्बल पाच माजी आमदार आणि अन्य मातब्बरांनी पक्षाचा त्याग करून अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश केल्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. आता जिल्ह्यात माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, माजी विधानसभा सभापती अरूणभाई गुजराथी, माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन, माजी आमदार अरूण पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आदींचा अपवाद वगळता पक्षात मोठे नेते उरलेले नाहीत. तोंडावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतांनाच हा पक्ष प्रवेश सोहळा घडल्याने शरद पवार गटासमोरील आव्हान अजून खडतर होण्याची शक्यता आहे.