अखेर तलावात बुडालेल्या “त्या” तरूणाचा मृतदेह आढळला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील तालुक्यातील वसंतवाडी येथे तलावामध्ये भुलाबाई विसर्जनवेळी पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या रमेश भिका चव्हाण (४०) यांचा शोध सुरू असताना २२ तासानंतर मंगळवार, १० ऑक्टोबर रोजी दुपारी ३:१५ वाजता मृतदेहच हाती लागला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या दुर्दैवी घटनेने वसंतवाडीत हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी भुलाबाई विसर्जनासाठी मुली तलावावर गेलेल्या होत्या. त्या ठिकाणी रमेश चव्हाण हे काठावरून भुलाबाई घेऊन पाण्यात नेत होते. काही भुलाबाईंचे विसर्जन झाले व नंतर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास चव्हाण हे पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता. मंगळवार, १० ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजेपासून राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकाच्यावतीने (एसडीआरएफ) तलावामध्ये बोट व गळाच्या सहाय्याने या इसमाचा शोध सुरू करण्यात आला. दुपारी दीड वाजला तरी शोध न लागल्याने मुक्ताईनगर येथील पट्टीच्या पोहणाऱ्यांना (आपदा मित्र) बोलविण्यात आले. त्यांनी अडीच वाजता तलावात थेट उडी घेतली. त्यानंतर सव्वातीन वाजता इसमाचा शोध लागला मात्र तोपर्यंत त्यांचा बुडून मृत्यू झाला होता.

Protected Content