राणा दाम्पत्यासह १५ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल

लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राणा दाम्पत्याच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन केल्यावरून राणा दाम्पत्यासह १५ जणांविरुद्ध अमरावती पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबईत मातोश्री समोर हनुमान चालीसा पठणावरून गुन्हा दाखल आणि तुरुंगातून जामिनावर मुक्त झालेले खा.नवनीत राणा आणि आ.रवि राणा दाम्पत्य दिल्ली आणि लडाख दौरा करून तब्बल एक सव्वा महिन्यानंतर अमरावतीत दाखल झाले. नागपूर ते अमरावती या प्रवासादरम्यान, या दाम्पत्याचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीनंतर वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, रात्री उशिरापर्यंत ध्वनिप्रदूषण यासह विविध कलमांन्वये राणा दांपत्यासह १५ कार्यकर्त्यांच्या विरोधात अमरावती राजापेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान येथील इर्विन चौकात राणा दांपत्याला विरोध करण्यासाठी भीम ब्रिगेडचे कार्यकर्ते जमले होते, पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर राणा दांपत्य राजकमल चौकात पोहचल्यानंतर युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच नवनीत राणा यांनी गदा फिरवून कार्यकर्त्यांच्या उत्साहाला प्रतिसाद दिला. यांनतर राणा दांपत्याने रवीनगर परिसरातील हनुमान मंदिरात पोहचून हनुमान चालिसाचे पठण आणि आरतीत सहभाग घेतला. रात्री १० वाजेनंतरही या ठिकाणी भोंग्यांचा वापर सुरू होता, असा आरोप करीत अमरावती पोलिसांकडून रस्ता अडवून वाहतुकीला अडथळा, ध्वनिप्रदूषणासह विविध कलमांन्वये खा.नवनीत राणा, रवी राणा आणि इतर १५ जणांच्या विरोधात राजापेठ पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत.

Protected Content