शेतरस्त्यांनी सर्व शिवारांना जोडण्याचे व्रत हाती घेतलेय : पालकमंत्री

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शेतकरी हा समाजाचा आत्मा असून शेती हा त्यांचा श्‍वास असल्याची बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शिवारांना शेत रस्त्यांनी जोडण्याचे व्रत आपण हाती घेतले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील नांद्रा येथे विविध विकासकामांचे भूमिपुजन केल्यानंतर ते बोलत होते.

याप्रसंगी त्यांनी गावाच्या चौफेर विकासासाठी आपण प्रयत्नशील असून जनता हीच आपली जात आणि कामे हेच आपले कर्म असल्याचे नमूद केले. यामुळे आपल्याला सातत्याने काम करण्याची प्रेरणा आणि उर्जा मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच परिसरातील सर्व रस्ते दर्जेदार बनले असल्याने तरूणांनी येथून कमी वेगाने दुचाक्या चालविण्याचे आवाहन देखील केले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील नांद्रा येथे विविध कामांचे भूमीपुजन करण्यात आले. प्रारंभी गावकर्‍यांनी पालकमंत्र्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केले. त्यांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून नांद्रा बुद्रुकसह परिसरातील विकासकामांना गती आल्याबद्दल त्यांनी आभार मानले. सूत्रसंचालन उपशिक्षक राजेंद्र चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन सरपंच कैलास पाटील यांनी केले.

यांची होती उपस्थिती

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र  चव्हाण, कृ. उ. बाजार समिती सभापती कैलास  चौधरी,उपसभापती सुरेश पाटील, जि. प.सदस्य पवन सोनवणे, पं. समिती सभापतीपती जनाआप्पा पाटील, सरपंच कैलास बापू पाटील, उपसरपंच पंकज सोनवणे, माजी उपसभापती डॉ. कमलाकर पाटील, भरत बोरसे, रामचंद्र बापू पाटील, मुकुंदराव नन्नवरे, मच्छीन्द्र पाटील, शिवसेना विभाग प्रमुख गजानन सोनवणे, दिलीप जगताप, शिवाजी सोनवणे, भाऊसाहेब पाटील, अशोक  सोनवणे, दिलीप आगीवल, दगडू नाना चौधरी, सुरेश सोनवणे,  निलेश वाघ, सुनील सोनवणे, हितेश आगीवल, एकनाथ सोनवणे, मनोज पाटील, विजय बाविस्कर, गणेश सोनवणे, प्रकाश सोनवणे, समाधान पाटील, मनोज पाटील व परिसरातील सरपंच, वि.का.सोसायटी चेअरमन पदाधिकारी मोठ‌्या संख्येने उपस्थित होते.

गुलाबभाऊंचे युवकांना आवाहन

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी नांद्रा परिसरातील सर्व लहान-मोठे पूल आणि मोर्‍यांची कामे लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती आपल्या मनोगातून दिली. याप्रसंगी त्यांनी आपल्या भाषणातून एक वेगळा पण भावनिक मुद्दा मांडला. ते म्हणाले की, नांद्रा परिसरच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघातील रस्ते हे  चांगले बनल्यामुळे अनेक युवक हे यावरून भरधाव वेगाने दुचाक्या चालवत असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी असे करू नये. आपल्या मागे घरात आई-वडील, भावंडे आणि संपूर्ण कुटुंब आहे याची जाणीव ठेवून तरूणांनी सावधगिरीने वाहने चालवावीत असे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तर नांद्रा येथील नागरिकांच्या संपूर्ण विकासासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे देखील त्यांनी पुन्हा एकदा आवर्जून सांगितले.

 

Protected Content