मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बुस्टर यात्रेत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल करत बाबरी पतनात शिवसेना होती कुठे ? असा बोचरा प्रश्न विचारला. आपण स्वत: या प्रकरणी जेलमध्ये असतांना उध्दव ठाकरे तेव्हा कुठे होते ? अशी विचारणा देखील त्यांनी केली.
आज औरंगाबाद येथे राज ठाकरे यांची सभा होत असतांनाच मुंबईत भाजपची बुस्टर सभा होत आहे. या सभेच्या आधी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बुस्टर रथावर स्वार होऊन सभास्थळी आले.
या सभेतील आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारलाच लक्ष्य केले असले तरी त्यांच्या टिकेचा संपूर्ण रोख हा शिवसेनेकडेच असल्याचे दिसून आले. बाबरी प्रकरणी बोलताना फडणवीस म्हणाले की, हिंदू कधी मशिद पाडूच शकत नाही. तो ढाचा होता, ते जुलमाचे आणि परायजाचे प्रतिक होते ते पाडण्याचं काम आम्ही अभिमानानं केलं. तो ढाचा पाडताना देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी होता. याच राम मंदिरासाठी सेन्ट्रल जेलमध्ये मी १८ दिवस घालवले आणि तुम्ही आम्हाला विचारता, बाबरी पडली तेव्हा तुम्ही कुठे होता? असा सवाल फडणवीस यांनी याप्रसंगी केला.
फडणवीस पुढे म्हणाले की, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही. मला हिंदूची संख्या कमी करायची नाही. पण तुम्ही म्हणजे हिंदूत्व नाही, असे देखील फडणवीस म्हणाले. बाबरी मशिदीवरील भोंगे काढायला सांगितले तर ते झालं नाही आणि हे म्हणतात आम्ही बाबरी ढाचा पाडला हे अभिमानानं सांगतो. तेव्हा महाराष्ट्रातील तुमचा कोणता नेता गेला होता. जे ३२ आरोपी होते ते कोण होते? त्यामध्ये तुमचा कुठला नेते होते असा प्रश्न फडणवीस यांनी केला. कल्याण सिंग हे मुख्यमंत्री असतांना त्यांनी पोलिसांना गोळीबार करण्याची परवानगी नाकारल्यामुळे बाबरीचे पतन झाल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. तर, महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हटलं तर राजद्रोह होतो. माझा तुम्हाला सवाल आहे की तुम्ही रामाच्या की रावणाच्या बाजूचे आहात याचा निकाल तुम्ही लावा असे आव्हान देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले.