देशातील प्रत्येक नागरिक असुरक्षित : संजय राऊत

नवी दिल्ली वृत्तसंस्था | पेगॅसस सॉफ्टवेअरच्या मदतीने मान्यवरांवर ठेवण्यात आलेल्या पाळतीचे प्रकरण हे अतिशय गंभीर असून यामुळे देशातील कुणीही नागरिक सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाल्याचा आरोप आज शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला.

पेगॅसस सॉप्टवेअरच्या मदतीने केंद्रीय मंत्री, विरोधी राजकारणी, पत्रकार आदी मान्यवरांच्या स्मार्टफोनमधून करण्यात आलेल्या हेरगिरीचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. यावरून विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलतांना या प्रकारावर भाष्य करत भाजपवर टीका केली.

संजय राऊत म्हणाले की, पेगॅससद्वारे करण्यात आलेल्या हेरगिरीचे प्रकरण हे अतिशय गंभीर आहे. यात दोन केंद्रीय मंत्र्यांचा समावेश हा लक्षणीय असा आहे. यामुळे आता केंद्र सरकार आपल्या सहकार्‍यांवरच पाळत ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे. भारतीय जनता पक्षाने या प्रकरणी बचाव केला असला तरी तो अतिशय दुबळा असाच आहे. जर ते विरोधात असते तर त्यांनी रान उठविले असते. मात्र आता ते मूग गिळून असल्याचा आरोप राऊत यांनी केला. मोदी सरकार देशातील प्रत्येकावर नजर ठेवून असल्याने कुणीही सुरक्षित नसल्याचा आरोप राऊत यांनी याप्रसंगी केला.

Protected Content