यावल महाविद्यालयात रसायनशास्त्र कार्यशाळा उत्साहात

यावल  – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील ज.जि.म.वि.प्र.सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष विज्ञान वर्ग रसायनशास्त्र विषयाची विद्यापीठ स्तरीय अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेचे उद्घाटन माजी प्र-कुलगुरू प्रोफेसर डॉ. पी. पी. माहूलीकर यांच्या हस्ते सरस्वती व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. अध्यक्षस्थानी रसायन शास्त्र अभ्यास  मंडळाचे चेअरमन प्राचार्य डॉ. एस. एस राजपूत (दादासाहेब रावळ महाविद्यालय, दोंडाईचा) हे होते. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. आर. पी. फालक, अभ्यास मंडळ सदस्य प्र. प्राचार्य डॉ. एच. ए. महाजन, प्रोफेसर. ए. एम. नेमाडे, डॉ. जी. एच. सोनवणे, डॉ. निलेश पवार, उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील उपस्थित होते. तसेच जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एकूण 80 प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा आयोजन करण्या मागील भूमिका विषद केली. याप्रसंगी उद्घाटक माजी प्र-कुलगुरू डॉ. पी. पी. माहूलीकर यांनी प्राथमिक शिक्षण हे उच्च शिक्षणाचा पाया आहे तर उच्च शिक्षण हे देशाचा विकासाचा पाया आहे म्हणून उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम पुनर्रचना करताना रोजगार संधी, संशोधनाला महत्त्व,शिक्षणाचा समतोल आदी यांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे असे प्रतिपादन आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. एस. एस. राजपूत यांनी शिक्षणाची गुणवत्ता व भविष्यकाळात शिक्षणाची आवश्यकता यावर अभ्यासक्रम पुनर्रचना करण्याची गरज का आहे यावर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.आर. पी. फालक  यांनी सक्षम विद्यार्थी व स्पर्धेत टिकणारा विद्यार्थी आधारित अभ्यासक्रम असायला हवा असे मार्गदर्शन केले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.एस. पी. कापडे यांनी केले व आभार सदर कार्यशाळेचे समन्वयक प्रा. एम. डी. खैरनार यांनी मानले. सदर अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा दोन सत्रात आयोजन करण्यात येऊन प्रथम वर्ष विज्ञान रसायनशास्त्र या विषयाला अंतिम स्वरूप देण्यात आले.

कार्यशाळेच्या समारोप सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ एस. एस.राजपूत हे होते. यात अभ्यासक्रम पुनर्रचना बाबत  सविस्तर चर्चा होऊन डॉ. एस. जी‌ शेलार (भडगाव), डॉ. आर. के. चौधरी (दोंडाईचा), डॉ. एस. एन. वैष्णव (ऐनपूर) यांनी विषयनिहाय मत मांडले. डॉ. ए. एन. सोनार (रावेर) व प्रा. के. एम. बोरसे (धुळे) यांनी कार्यशाळा  ही दिशादर्शक व उत्कृष्ट आयोजनाबाबत मत मांडले.

समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. पी. कापडे यांनी केले तर आभार रसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. डी. पवार यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, उपप्राचार्य संजय पाटील, डॉ. सुधा खराटे, प्रा.एस. आर.गायकवाड, डॉ. एच. जी. भंगाळे, डॉ. पी. व्ही. पावरा,श्री मनोज पाटील, शेखर चव्हाण, डी. एन. मोरे, अरुण सोनवणे, सी. के. पाटील,  व्ही.व्ही.पाटील,  इ. आर. सावकार, मिलिंद बोरघडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

 

Protected Content