बारा गाड्यांच्या सोहळ्यासाठी तांबापुरात अतिक्रमण हटवले!

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत अक्षय तृतीयेच्या सायंकाळी होणाऱ्या १५० वर्षांच्या ऐतिहासिक बारा गाड्या ओढण्याच्या भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कंबर कसली आहे. सोहळ्याचा मार्ग सुरळीत आणि मोकळा करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज, मंगळवारी (२९ एप्रिल) रोजी सकाळी तांबापुरा परिसरात विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबवली.

तांबापुरा हा बारा गाड्यांच्या पारंपरिक मार्गातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या भागात अनेक वर्षांपासून असलेल्या अतिक्रमणामुळे दरवर्षी सोहळ्याच्या वेळी वाहतुकीस आणि गाड्या ओढण्यास अडथळे येत होते. याची दखल घेत मनपा प्रशासनाने यंदा कठोर भूमिका घेतली आणि वेळेत कारवाई करत अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला.

आज सकाळी मनपाच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या मदतीने तांबापुरा परिसर पूर्णपणे अतिक्रमणमुक्त केला. नागरिकांना या कारवाईची पूर्वकल्पना असल्याने त्यांनीही प्रशासनाला सहकार्य दर्शवले. त्यामुळे कोणतीही वादावादी किंवा अडथळा न येता ही मोहीम यशस्वी झाली. आता रामेश्वर कॉलनीतील ऐतिहासिक बारा गाड्या ओढण्याचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडणार आहे.

Protected Content