मुंबई वृत्तसंस्था । पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील कर्जघोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी मुंबई व परिसरातील सहा ठिकाणी छापे टाकले.
याबाबत अधिक माहिती अशी की, रिझर्व्ह बँकेने पीएमएलए (प्रीव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट) अंतर्गत दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे या प्रकरणी अधिक पुरावे गोळा करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. या बँकेला २००८पासून ४,३५५ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे प्राथमिक तपासातून दिसून आले आहे, असे पोलिसांनी यापूर्वीच म्हटले आहे. या बँकेच्या सहा राज्यांत १३७ शाखा असून बँकेकडे ११ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. एचडीआयएलला दिलेले सव्वासहा हजार कोटी रुपयांचे कर्ज थकल्याने ही बँक अडचणीत आली व रिझर्व्ह बँकेने तिच्यावर सहा महिन्यांचे आर्थिक निर्बंध घातले. रिझर्व्ह बँकेच्या सुधारित निर्णयानुसार बँकेच्या खातेदारांना आपल्या खात्यातून सहा महिन्यांच्या कालावधीत आता कमाल २५ हजार रुपये काढता येतील.