मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुंतवणूक केल्याचे त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. मग त्यांना २० कोटी रुपयाचा नफा कसा झाला?, याचा तपास सध्या ईडीकडून सुरू आहे.
कोहिनूर स्वेअर टॉवर्स बांधणाऱ्या मातोश्री रिअल्टर्स या कंपनीमध्ये भागीदार असणाऱ्या राज यांनी खासगी गुंतवणूक केलेली नसतानाही त्यांना इतका फायदा कसा झाला याचा तपास ईडी करत आहे. या कंपनीमध्ये राज यांचा २५ टक्के वाटा होता. या प्रकरणामध्ये ‘ईडी’ सध्या वेगवेगळ्या कागदपत्रांची पडताळणी करत असून गरज पडल्यास राज ठाकरे यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवले जाईल, असे ईडीने स्पष्ट केले आहे. राज यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर या प्रकरणी चित्र आणखी स्पष्ट करण्यासाठी चौकशीचा दुसरा टप्पा होण्याची शक्यता आहे.