जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. नि.तु. पाटील यांनी ३० हजार मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरित्या पार करत वैद्यकीय क्षेत्रात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भुसावळसारख्या तालुक्याच्या ठिकाणाहून त्यांनी हे यश संपादन केले आहे, जे त्यांच्या कठोर परिश्रम आणि रुग्णांप्रति असलेल्या समर्पण भावनेचे प्रतीक आहे.
डॉ. पाटील यांनी त्यांच्या या उल्लेखनीय प्रवासाविषयी माहिती देताना सांगितले की, त्यांनी एमबीबीएसनंतर डीओएमएस केले. त्यांची पहिली मोतीबिंदू शस्त्रक्रिया २००५ मध्ये झाली. त्यानंतर त्यांनी मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये सेवा दिली. जे.जे. रुग्णालयात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राज्यभरातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. या अनुभवातून त्यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेतील अधिक कौशल्ये आत्मसात केली. जळगावमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी नेत्रज्योती हॉस्पिटल आणि नेत्रम हॉस्पिटलमध्येही नेत्रसेवा दिली.
१ मे २०११ रोजी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व रुग्णालयात कायमस्वरूपी रुजू झाल्यावर त्यांनी संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान यशस्वीपणे चालवले. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्यासह संस्थेच्या सर्व सदस्यांनी त्यांना या कार्यात मोलाचे मार्गदर्शन केले. याच प्रयत्नांमुळे रुग्णांचा विश्वास वाढत गेला आणि त्यांनी ३० हजार शस्त्रक्रियांचा टप्पा गाठला, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.
विशेष बाब म्हणजे, डॉ. पाटील यांनी एका डोळा निकामी झालेल्या आणि दुसऱ्या डोळ्यात मोतीबिंदू असलेल्या सुमारे ६०० रुग्णांना यशस्वीरित्या दृष्टी प्रदान केली आहे. अशा जोखमीच्या शस्त्रक्रिया करणे मोठे आव्हान असते, पण डॉ. पाटील यांनी ते लीलया पेलले आहे. ते दररोज पहाटे ४ वाजता शस्त्रक्रिया सुरू करतात आणि त्यांच्यासोबत निवासी डॉक्टर्स व सहकारी टीम उपस्थित असते.
डॉ. पाटील केवळ नेत्ररोग तज्ज्ञ नाहीत, तर त्यांनी वैद्यकीय शिक्षणासोबतच कायद्याची पदवी, हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये प्रथम क्रमांक, पत्रकारिता आणि इतर अनेक विषयात प्रावीण्य मिळवले आहे. त्यांच्या नावावर तब्बल ११ पदव्या आहेत. यासोबतच ते नर्मदा परिक्रमा करणारे एकमेव नेत्रतज्ज्ञ आहेत, त्यांनी १०८ दिवसांत पायी ३ हजार ६०९ किलोमीटरची परिक्रमा पूर्ण केली आहे. डॉ. नि.तु. पाटील हे डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वयाएवढ्या शस्त्रक्रिया करून त्यांचे अनोख्या पद्धतीने अभिष्टचिंतन करतात. त्यांच्या या कार्याचे डॉ. उल्हास पाटील यांच्यासह अनेकांनी कौतुक केले आहे.