जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राजपूत समाजाचे युवा नेते डॉ. दीपकसिंग राजपूत यांनी नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान, महाराष्ट्रातील राजपूत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये अमरावती विमानतळाला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावावर विशेष भर देण्यात आला.
डॉ. राजपूत यांनी राजनाथ सिंह यांचा गणपती बाप्पाची पितळेची मूर्ती आणि पारंपरिक शाल देऊन सन्मान केला. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील राजपूत समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन राजनाथ सिंह यांना सादर केले. या निवेदनात, २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राजपूत समाज मेळाव्यात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मान्य झालेल्या मागण्यांचा आढावा घेण्यात आला. डॉ. राजपूत यांनी नमूद केले की, या मेळाव्यात मान्य झालेल्या अनेक मागण्यांपैकी केवळ एकच मागणी पूर्ण झाली आहे. उर्वरित मागण्या महाराष्ट्र सरकारने अद्याप पूर्ण केलेल्या नाहीत.
निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये अमरावती विमानतळाला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाचा समावेश होता. डॉ. राजपूत यांनी या प्रस्तावाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, प्रतिभाताई पाटील यांनी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या सन्मानार्थ अमरावती विमानतळाला त्यांचे नाव देणे उचित ठरेल.
राजनाथ सिंह यांनी डॉ. राजपूत यांनी सादर केलेले निवेदन काळजीपूर्वक वाचले आणि त्यातील मुद्दे समजून घेतले. त्यांनी या विषयाची पडताळणी करून समाजाच्या मागण्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. तसेच, त्यांनी डॉ. राजपूत यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करत जळगावला आल्यास त्यांच्या घरी भेट देण्याचे वचन दिले. या भेटीदरम्यान राजनाथ सिंह यांनी डॉ. राजपूत यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. दीपकसिंग राजपूत म्हणाले, “माननीय राजनाथ सिंह यांच्याशी झालेली ही भेट राजपूत समाजाच्या मागण्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. त्यांचे आश्वासन आणि समजूतदारपणा यामुळे आम्हाला आशा आहे की, आमच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील.”