अमळनेर (प्रतिनिधी) येथील गलवाडे रोडवरील अंबिका मंगल कार्यालयातील सांडपाणी तसेच शौचालयाचे पाण्याचा निचरा करण्यासाठी चाऱ्या कोरण्यात आलेल्या आहेत. चाऱ्या खोदताना पाण्याची पाईप लाईन फुटून सांडपाणी पाईपलाईनमध्ये जात आहे. त्यामुळे दुषित पाणी पुरवठा होत असून स्थानिक रहिवांशाचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या संदर्भात अधिक असे की, सध्या अमळनेर शहरात ऐन उन्हाळ्यात पिण्यासाठी पाण्याची टंचाई सुरु आहे. तशात गलवाडे रोडवरील अंबिका मंगल कार्यालयातील सांडपाणी तसेच शौचालयाचे पाणी निचरा करण्यासाठी चाऱ्या कोरण्यात आलेल्या आहेत. या चाऱ्या खोदताना पाण्याची पाईप लाईन फुटून घाण पाणी पाईपलाईनमध्ये जात आहे. त्यामुळे नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत आहे. तसेच पिण्याचे पाण्याचा दिवस असूनदेखील नळ न आल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असून नगरपालीकेने लक्ष घालावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.