आठवडे बाजाराच्या दिवशी होतेय वाहतूक गैरसोय; पोलिस प्रशासनाचे साफ दुर्लक्ष

dharangainbajar

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव येथे दर गुरुवारी आठवडे बाजार भरत असतो, धरणगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने जिल्हाभरातून शेतकरी आपला शेतातील माल विकण्यासाठी मोठ्या संख्येने गुरूवारी येत असतात. नागरिक देखील मोठ्या संख्येने बाजार खरेदीसाठी येथे गर्दी असते. दिवसेंदिवस बाजाराची व्याप्ती वाढत असून शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी जागा अपूर्ण पडत असल्याने शेतकरी त्यांचा माल विक्रीसाठी रस्त्यावर बसत आहेत. या दिवशी धरणगाव-सोनवद रस्ता बंद करण्यात येतो. पर्यायी चिंतामण मोरया मार्गे सोनवदसाठी वाहने जात असतात. परंतु या रस्त्यावर देखील बाजाराची व्याप्ती वाढत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत असते. अनेकवेळा याठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होवून तासंतास रहदारीस अडथळा निर्माण होत असतो.

वाहतूकीच्या कोंडी होत असल्यामुळे या समस्येकडे पोलीस प्रशासन व नगरपालिकाचे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष करण्यात येत आहे. बसस्थानक परिसर, छत्रपती शिवाजी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक याठिकाणी वाहतूक कोंडी होत असून याठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणुकीची मागणी केली जात आहे. या ठिकाणी प्रत्येक वेळेस शांतता कमिटीच्या बैठकीत एका पोलीस कर्मचारीची नियुक्त करण्यात यावी अशी मागणी प्रत्येक वेळेस केली जाते. परंतु याकडे प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करतात. यातच मोबाइल चोरीचे प्रमाण, महिलांचे पर्स त्याच बरोबर दागिने सुद्दा चोरीस जात असतात. याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अशी मागणी तालुक्यातील नागरीक करत आहेत. तसेच वाढती बाजारपेठ पाहता नगरपालिकेने शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी पर्यायी जागा देण्याची मागणी शेतकरी व व्यापारी वर्गातून होत आहे.

Add Comment

Protected Content