महावितरणची धडक मोहीम: २०० जणांवर वीज चोरीची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रामाणिक वीज ग्राहकांना अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठा करता यावा यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. धरणगाव, चोपडा, एरंडोल आणि अमळनेर तालुक्यात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत २०० ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे.

२५० कर्मचाऱ्यांचा समावेश
वीज मीटर बायपास करणे, वाहिन्यांवर आकडे टाकणे किंवा मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे महावितरणच्या धरणगाव विभागीय कार्यालयाने मागील दोन दिवसांपासून २५० कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली ५० पथके तयार करून मोहीम राबवली.

९३० ग्राहकांच्या मीटरची तपासणी
या मोहिमेत ५० पथकांनी एकूण ९३० ग्राहकांच्या मीटरची तपासणी केली. यात ५२ जणांनी आकडे टाकून व मीटरला बायपास करून वीज चोरी केल्याचे आढळून आले. सुमारे १५० जणांनी मीटरमध्ये फेरफार करून विजेचा गैरवापर केला. त्यांच्यावर भारतीय विद्युत कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येत आहे, असे महावितरण विभागाने कळवले आहे. या मोहिमेमुळे प्रामाणिक वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे, तर वीज चोरट्यांचे धाबे दणाणले आहे. महावितरणची ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे अशी माहिती महाविरण विभागाकडून देण्यात आले आहे.

Protected Content