दर्ग्यावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर आग्यामोहोळ मधमाश्यांचा हल्ला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबादपासून जवळच असलेल्या भागपूर धरणाजवळ असलेल्या हमदमशाह बाबांच्या दर्ग्यावर नाशिक जिल्ह्यातील भाविकांवर अचानक आग्यामोहोळ मधमाश्यांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली. त्यामुळे पळापळ झाली. जखमी १० भाविकांवर नशिराबाद व जळगाव येथे उपचार झाल्यानंतर ते नाशिकला घरी निघाले.

नशिराबाद तालुक्याजवळ भागपूर धरण आहे. तेथे हमदमशाह बाबांचा दर्गा आहे. दर्ग्यावर दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. दर्ग्यावर नवस (मन्नत) बोलून इच्छा व्यक्त करतात. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील शहा परिवारातील सदस्यांनीदेखील मन्नत मागितली होती. ती पूर्ण झाल्यामुळे ते हमदमशाह बाबांच्या दर्ग्यावर दर्शनाला आले होते. दर्ग्यावर दर्शन घेऊन झाल्यावर ते परिसरात लोबान टाकत असताना त्याचा धूर जवळच्या झाडांवर गेला.

तेथे झाडावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यावर धूर गेल्याने आग्यामोहोळ मधमाश्यांनी झाडाखाली असलेल्या भाविकांवर हल्ला चढविला. त्यामुळे भाविकांची पळापळ झाली. काहींनी जवळच्या तलावात उडी मारली. यावेळी मालेगावचे फैजल शाह (वय २२), सुपडू शाह (वय ५०), नूराबी शहा (वय ४७), मायोनुद्दीन रजा शाह (वय १७), फिरोजाबी शाह (वय ३७), निकहत फातेमा (वय-१८), हुमेराबी शाह (वय १६), वसीम शाह (वय १९), सादिया फातेमा (वय १८) यांच्यासह नाजीम शेख अहमद (वय २०, रा. तांबापुरा, जळगाव) हे भाविक जखमी झाले.

त्यांना कारमध्ये नशिराबाद आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. तेथे प्रथमोपचार झाल्यानंतर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुढील उपचार करण्यात आले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर झाल्यावर रुग्णालयातून घरी जाऊ देण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी गर्दी केली होती.

Protected Content