देवळी-गोगडी धरण आटल्याने मुक्या प्राण्यांची भटकंती (व्हिडीओ )

WhatsApp Image 2019 04 16 at 12.31.31 PM

पहूर, ता . जामनेर ( रविंद्र लाठे ) एकिकडे दिवसेंदिवस चैत्राचे ऊण तापत असतांना अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाळ्यात देवळी-गोगडी धरण आटले असल्याने कोरडे ठाक  पडले आहे.  मोतीआई धरणावरून पहूर-कसबे , पहूर-पेठ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र मुक्या जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या  मुक्या जनावरांसाठी वनविभागाने  कृत्रिम पानवठे तयार करून मुक्या जीवांना दिलासा देण्याची मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे .

 

धरण उशाला..कोरड घशाला ..

पहूर कसबे,  पहूर पेठ,  सांगवी गावाची तहान भागविणारे गोगडी धरण गावाजवळच आहे. परंतू, अल्पपर्जन्य आणि  अवैध पाणी उपसा यामुळे जानेवारी- फेब्रुवारी महीन्यांपासूनच गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईच्या झळा  पहूरकरांना  सोसाव्या लागत आहेत.

कृत्रिम पाणवठ्याची गरज

जंगल शिवारातील नदी, नाले, धरणं कोरडेठाक पडले असून विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे.  त्यामुळे वन्यजीव , पशू – पक्षी पाण्यासाठी वणवण भटकत आहे. पाण्याच्या शोधार्थ माकडांचे जत्थे गावाकडे येऊ लागले आहेत. जंगल शिवारात कृत्रीम पाणवठे , हौद तयार करण्याची गरज आहे .

वीस दिवसातून पाणी पुरवठा

सध्या पहूरकरांना भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागत असल्याने हात पंपावर हंडाभर पाण्यासाठी तासंतास महिलांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. मोती आई धरणावरून गावात पाणीपुरवठा होत असुन वीस दिवसातून एकदाच पाणी पुरवठा होत असल्याने  भीषण  पाणी  टंचाईस सामोरे जावे लागत आहे.  काही शेतकरी शेत शिवारातून बैलगाडी द्वारे पाणी आणत आहेत.

टॅंकरला “अच्छे दिन”

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानामुळे  भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने  पाणी टँकरचा व्यससाय सध्या तेजीत आला आहे . २००  लिटर पाण्यासाठी पन्नास  ते सत्तर रूपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे टँकरला अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे.

Add Comment

Protected Content