यावल प्रतिनिधी । शहरालगत असलेल्या नविन वस्त्यांमधे नगरपालिकेकडून टाकण्यात येत असलेल्या पाईपलाईनचे कमी दराची निवीदा मुख्याधिकारी बबन तडवी यांनी स्थायी समितीसमोर न ठेवता कंत्राटदाराशी आर्थीक संगनमत करून वाढीव दराने मंजुरी दिली. या आर्थिक गोंधळामुळे पालीकेचे सुमारे ५० लाखांचे नुकसान मुख्यधिकारी यांनी केले असल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेत्यातर्फे करण्यात आले असून यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले आहे.
या संदर्भात आर्थीक मोहास बळी नगरपालीकेस पन्नास लाख रुपयांचे भुर्दंड देणाऱ्या मुख्याधिकारी यांना त्वरीत निलंबीत करण्यात यावे अशी मागणी केली आहे. यावल नगरपालीकेच्या कार्यक्षेत्रात मागील ३० वर्षात शहरालगत झालेल्या वाढीव वस्त्यामध्ये पाईपलाईन नसल्याने पालीकेकडून पाणीपुरवठा केला जात नव्हता. अशा वेळी शासनाच्या माध्यमातुन वैशिष्ठेपुर्ण योजनेतून सद्या सुमारे तिन कोटी ६५ लाख रूपये निधी खर्चातुन पाईपलाईन टाकण्याचे कामे वेगाने सुरू आहे. माजी नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे गटनेते दिपक रामचंद्र बेहेडे व काँग्रेसचे गटनेते सैय्यद युनुस सैय्यद युसुफ यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वृत्तपत्राच्या ई टेंडरनुसार या कामासाठी पाच कंत्राटदारांनी निवीदा भरलेल्या होत्या. मात्र मुख्याधिकारी बबन तडवी यांनी कमी दराची आलेली सुनिल पाटील यांची निविदा अपात्र करून स्थायी समीतीसमोर चार निवीदा धारकांची यादी ठेवली. त्यात अमळनेरचे एस. कुमार कन्स्ट्रक्शन कंपनीशी आर्थीक संगनमत करून त्यांना कंत्राट दिला आहे.यात पालीकेचे नुकसान झाले असल्याने त्यांना त्वरीत निलंबन करावे व कामास स्थगीती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.