रावेर, प्रतिनिधी | शहरामध्ये आधारकार्ड नोंदणीसाठी एकच केंद्र असल्याने तालुक्यातील लोकांचे हाल होत आहेत. या केंद्रावर स्त्रिया, लहान मुले व म्हाताऱ्या लोकांना लाईनीमध्ये तासंतास ताटकळत उभे रहावे लागत आहे. त्यामुळे शहरात आणखी एक नोंदणी केंद्र सुरु करण्यात यावे, अशी मागणी येथील तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्याकडे आज (दि.३०) एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तालुका भारिप बहुजन महासंघ व एम.आय.एम. यांच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील लहान-मोठ्या गावातील लोकांना दिवसभर आधार कार्डासाठी लाईनीमध्ये बसुन रहावे लागत आहे. १० मिनिटांच्या कामासाठी त्यांना चार ते पाच तास लागत आहेत. तर काही लोकांचा गर्दीमुळे भाडे खर्च करुन आल्यावरसुद्धा नंबर लागत नसल्यामुळे त्यांना तसेच घरी परत जावे लागत आहे. त्यामुळे शहरामध्ये आणखी एक आधारकार्ड केंद्र सुरु करण्यात यावे, असे म्हटले आहे. या निवेदनावर भारिप बहुजन महासंघाचे तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे, एम.आय.एम.चे अध्यक्ष शे. वशीम, उपाध्यक्ष शे. शरिफ, सचिव शे. अकबर, शे.अनिस, शे.सलमान, शे. जफर, शे.मुस्तकिन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.