रावेर तालुक्यातील केळी उत्पादकांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याची मागणी

raver 2

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील केळीच्या लागवडी बागांवर सी.एम.व्ही व्हायरस झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे रोपे पुरविणाऱ्या कंपनीने शेतकऱ्यांना शक्य तितकी मदत करावी, आणि शासनाने नुकसानीचे पंचनामे तयार करावे, अशा मागणीचे निवेदन आज तहसिलदा-यांना देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, केळी बागांवर सी.एम.व्ही व्हायरस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रावेर तालुका कृषी अधिकारी यांच्या शिफारशीनुसार रोगग्रस्त केळी काढून फेकल्या आहेत. परंतू तरीही शेकडो शेतकरी बांधवाच्या केळी बागांमध्ये सी.एम.व्ही व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात पसरत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर शासनाने किंवा रोपे पुरविणाऱ्या कंपनीने शेतकऱ्यांना शक्य त्या स्वरूपात मदत करावी, तसेच शासनाने या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित तयार करावे, अशा आशयाचे निवेदन तहसीलदा-यांना देण्यात आले असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जळगाव जिल्हा विद्यमान पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना या निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर रावेर कुषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डी.सी.अण्णा, माजी सभापती डॉ. राजेंद्र पाटील, रावेर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी रावेर विलास ताठे यांच्यासह अनेक शेतकरी व लोकप्रतिनिधींच्या सह्या निवेदनावर आहेत. यावेळी रमाकांत बोंडे, महेंद्र महाजन, प्रशांत पाटील, कुंभारखेडा मिलींद बोंडे, पंकज चौधरी, मनोज पाटील, विकास पाटील, सावखेडा वाघोदा येथील रमाकांत महाजन यांच्यासह अनेक गावातील शेतकरी उपस्थित होते.

Protected Content