यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना दुर्गंधीयुक्त आणि पिळसर रंगाचा दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच, नगरपरिषदेच्या दुर्लक्षित कारभारामुळे शहरात अस्वच्छता पसरली असून, गटारी तुंबल्या आहेत. यामुळे शहरवासीयांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या समस्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन त्या सोडवाव्यात, अशी मागणी शिवसेना (उबाठा गट) पक्षाने केली आहे.
शिवसेनेने यावल शहरातील विविध समस्यांबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निशिकांत गवई यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, नगरपरिषदेमार्फत नागरिकांना पिळसर रंगाचा, दुर्गंधीयुक्त आणि अशुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे, जे नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. याशिवाय, बोरावल गेट ते भुसावळ नाका या मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, तसेच पावसाळ्यापूर्वी शहरातील विविध ठिकाणी असलेले नाले आणि दुर्गंधीयुक्त सांडपाण्याने तुंबलेल्या गटारी व नाले स्वच्छ करावेत, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.
प्रशासनाने या तक्रारींची तातडीने दखल न घेतल्यास शिवसेना (उबाठा गट) आंदोलन छेडेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर जगदीश कवडीवाले, संतोष धोबी, शरद कोळी, हुसेन तडवी, अजहर खाटीक, पप्पू जोशी, प्रकाश वाघ, पिंटू कुंभार, सुनील बारी, सारंग बेहडे, योगेश चौधरी, प्रवीण लोणारी, योगेश राजपूत, चिंधु कुंभार यांच्यासह शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
यावल शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करणे आणि शहरात स्वच्छता राखणे, हे नगरपरिषदेचे प्राथमिक कर्तव्य आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेनेने प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या समस्या तातडीने न सोडवल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला आहे.