शेतकऱ्यांना फसवलेल्या हायटेक कंपनीवर निवेदनाद्वारे कारवाईची मागणी- आ. मंगेश चव्हाण

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ज्वारीची लागवड केली असता कणसाला धान्यच नसल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक केलेल्या हायटेक कंपनीवर कारवाई‌ करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, या आशयाचे निवेदन कृषिमंत्री, कृषी विभागाचे प्रधान सचिव व अतिरिक्त पोलीस महासंचालक यांना आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले.

 

यासंदर्भात माहिती अशी की, हायटेक कंपनीने तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांना बोगस ज्वारीच्या बियाणे विक्री करून फसवणूक केल्याची बाब उघडकीस आली आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या लक्षात आल्याने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली असता. तर चक्क कणसाला धान्यच नव्हते. त्यामुळे या कंपनीवर कारवाई‌ करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी. या आशयाचे निवेदन आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे , कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले व राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंह यांची भेट घेऊन दिले. दरम्यान संबंधित हायटेक कंपनीच्या ३२०६ या ज्वारी वाणाच्या कणसांना दाणेच न आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने कंपनीवर गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांच्या झालेल्या कोट्यवधीच्या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली. यावेळी माजी आमदार तथा कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, भाजपा शहर सरचिटणीस जितेंद्र वाघ आदी उपस्थित होते. याबाबत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी तात्काळ राज्याचे गुणनियंत्रक संचालक यांना चौकशीचे आदेश देऊन सबंधित कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले तर कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी देखील या प्रकरणात स्वतः वैयक्तिक लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Protected Content