जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मौजे शिंगाडी येथील पुनर्वसन विषयी मागण्यांसाठी शिंगाडी गावातील ग्रामस्थ ३० मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले आहेत.
रावेर तालुक्यातील मौजे शिंगाडी येथील पुनर्वसन विषयी मा. कार्यकारी अभियंता, सरदार सरोवर – १ ( विभाग ) हे मूल्यांकन अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे पुढील कार्यवाहिस विलंब होत आहे. त्यामुळे त्यांनी त्वरित अहवाल सादर करावा. पुनर्वसनाकरीता गट नंबर २२२/१ हा समाविष्ट करण्यात आला आहे. या गट नंबरवर संबंधित शेतकऱ्यांनी बेकायदेशीररित्या प्लॉट पडलेले असल्याने त्या सर्व नोंदी रद्द करण्यात याव्या; व शासनाची दिशाभूल करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. या प्रमुख मागण्यांसाठी शिंगाडी गावातील ग्रामस्थ ३० मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,” रावेर तालुक्यातील सन २००७ साली शिंगाडी गावाच्या पुनर्वसनाला तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली. त्यानंतर या प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यामध्ये पुनर्वसनासाठी ८ गट नंबर संपादित करण्यात आलेले आहे. त्यापैकी गट नंबर २२२/१ हे सुद्धा समाविष्ट आहे.
क्षेत्र सुस्थितीत असूनदेखील ते क्षेत्र संबंधित शेतकरी यांनी कायदा धाब्यावर बसवत त्या क्षेत्रांमध्ये शासनाची ना हरकत नसतांना तिथे प्लॉट बेकायदेशीर पाडून खरेदीखत केलेले आहे. बिनशेती नसलेले शेतीचे उतारे शिंगाडी ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक यांनी नमुना नंबर ८ ला कशाच्या आधारावर लावलेत याची संपूर्ण चौकशी होणे गरजेचे आहे.
सदर जमीन महसुल कायद्याप्रमाणे तुकडा बंदी असतांना तलाठी सर्कल यांनी कुणाच्या आदेशाने या शेतीची नोंद केली ? मा. प्रांताधिकारी फैजपूर येथील तत्कालीन प्रांताधिकारी अंतुर्लीकर यांनी संबंधित सहाय्यक निबंधक सावदा यांना सदर गट नंबर वर खरेदी विक्री करू नये असे पत्र दिले असतांना सुध्दा या शेतातील खरेदी विक्री कशी करणेत आली ? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे .
कार्यकारी अभियंता सरदार सरोवर विभाग १ यांना फैजपूर प्रांत कार्यालयातुन ४ वेळा स्मरणपत्र देऊन देखील यांनी सदर जमिनीचे मूल्यांकन अहवाल सादर केलेला नाही. मूल्यांकन अहवालाअभावी निवाडा घोषित होऊ शकणार नाही. त्यासाठी अनेकदा गावकरी मंडळी व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भेटूनसुद्धा काही एक उत्तर त्यांनी दिले नाही. त्यामुळेच ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करीत आंदोलनाला सुरुवात केली .
ग्रामस्थांच्या मागण्या विचारात घेऊन त्यांना न्याय न मिळाल्यास समस्त गावकरी तापी नदीच्या पात्रात जलसमाधी घेतील. असा इशारादेखील आंदोलनकर्त्यांनी दिला आहे .
सदर आंदोलनास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाचे ( आठवले गट ) उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, भुसावळ नगरपालिकेच्या नगरसेविका तथा माजी उपनगराध्यक्षा लक्ष्मीताई मकासरे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, वीर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीप सपकाळे यांनी भेट देऊन त्यांच्या संघटनांच्या वतीने पाठिंबा दिला.
आंदोलनात मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वात अनिल बगाडे, अमृत पाटील, उमेश गाढे, संदीप कोजगे, फुलसिंग कोजगे, आनंदा कोजगे, विजय बगाडे, रमेश पाटिल, विश्वनाथ पा पाटील, साहेबराव पाटील, यादव पाटील, संतोष बगाडे, प्रभाकर बगाडे, भागवत बगाडे, हिरामण कोजगे, सुमनबाई बगाडे, पुताबाई कोजगे, लिलाबाई कोजगे, गोविंदा कोजगे, प्रविण कोजगे, आशाबाई कोजगे आदि ग्रामस्थ सहभागी झाले.