यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल ते भुसावळ आणि यावल ते फैजपूर या दोन्ही महत्त्वाच्या मार्गांची अवस्था पुन्हा एकदा बिकट झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे हे मार्ग आता अपघातांना आमंत्रण देणारे ठरत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेकडो वाहनधारकांनी केली आहे.
यावल ते भुसावळ हा १८ किलोमीटरचा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो, तर यावल ते फैजपूर हा १७ किलोमीटरचा मार्ग राज्य महामार्गाकडे आहे. या दोन्ही मार्गांवर वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही मार्गांवर मध्यभागी आणि इतर ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, हे खड्डे गंभीर अपघातांना कारणीभूत ठरू शकतात.
यावल-भुसावळ मार्गावर निमगाव गावाजवळ तीन ठिकाणी धोकादायक व्ही वळणे आहेत. या वळणांच्या कडेला मोठमोठी झाडेझुडपे वाढलेली असल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक विकास जंजाळे यांच्या दुचाकीचा अपघात झाला होता, ज्यात त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. या गंभीर घटनेनंतरही प्रशासनाने या धोकादायक वळणांकडे आणि खड्ड्यांकडे दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि राज्य महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन मोठा अपघात होण्यापूर्वी या दोन्ही महत्त्वाच्या मार्गांची दुरुस्ती करावी, अशी आर्त हाक असंख्य वाहनचालकांनी दिली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहन चालवणे अत्यंत जिकिरीचे झाले असून, अनेक वेळा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.