देशभरातील पोलिसांना कोरोनाचा विळखा; महाराष्ट्रात सर्वाधीक संसर्ग

नवी दिल्ली । कोरोनाच्या लढाईत मोलाची भूमिका पार पाडणार्‍या पोलिसांना या विषाणूने मोठ्या प्रमाणात ग्रासल्याचे दिसून आले असून यात महाराष्ट्रातील पोलीस सर्वाधीक बाधीत असल्याची आकडेवारी इंडियन पोलीस फाऊंडेशन या संस्थेच्या अहवालातून समोर आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस कर्मचार्‍यांना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे दिसून आले आहे. देशात तब्बल ६१ हजारांहून अधिक पोलिस जवानांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. इंडियन पोलिस फाउंडेशनच्या वतीने यासंबंधीचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

या आकडेवारी नुसार देशातील ३० लाख ३५ हजार ६३२ पैकी ६१ हजार ९३५ पोलिस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. २५ हजार १३ पोलिस कर्मचार्‍यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर, ३७५ कर्मचार्‍यांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे.

लक्षणीय बाब म्हणजे महाराष्ट्रातील १४ हजार ६७ पोलिस कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली. यातील ८ हजार जवानांना क्वारंटाईन करण्यात आले. तर, १४२ कर्मचार्‍यांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रानंतर दुसर्‍या क्रमांकावर पश्‍चिम बंगाल असून राज्यातील ९६ हजार १८७ पैकी ४ हजार ५०० जवानांना कोरोनाची लागण झाली आहे, तर २० जणांचा मृत्यू झाला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आठ राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाही पोलिस कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे.

Protected Content