जळगाव, प्रतिनिधी | नूतन मराठा महाविद्यालयाच्या परिसरात गुंडगिरी वाढली असून या गुंडांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी प्राचार्य डॉ.एल.पी. देशमुख यांनी आज एका पत्रपरिषदेत केली.
नुकत्याच शहरातील मु.जे. महाविद्यालयात झालेल्या खुनाच्या घटनेनंतर या मागणीकडे विशेष गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. आज दुपारी प्राचार्य देशमुख यांनी महाविद्यालयाच्या आवारात ही पत्रपरिषद आयोजित केली होती. ते यावेळी म्हणाले की, गेल्या वर्षभरात विजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, पियुष पाटील, यांनी आपल्या साथीदारांसह महाविद्यालयाच्या आवारात शिक्षकेतर कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांच्यावर हल्ले करून दहशत निर्माण केली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत, त्यांना जामिन नाकारण्यात आले आहेत. तरीही पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. या सगळ्यांवर कारवाई न झाल्यास १० जुलै रोजी महाविद्यालयाचे सुमारे १५० कर्मचारी एक दिवस कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. त्यानंतरही कारवाई न झाल्यास बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचेही प्राचार्य देशमुख यांनी यावेळी सांगितले.