जळगाव, प्रतिनिधी । आधुनिक महाराष्ट्र घडविण्यासाठी घेतलेल्या अनेक निर्णयामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना महायुती विक्रमी आकडा घेवून निवडून येईल आणि जिल्ह्यासह राज्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ होणार असल्याचा दावा जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी आज (दि.१०) येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत केला. रविवारी (दि.१३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सकाळी ११.०० वाजता जळगावात होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. जळगावातील विमानतळासमोर असणाऱ्या १०० एकर जागेत ही सभा होणार आहे. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महाराष्ट्राला दुष्काळमुक्त बनवून एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनविण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळातील भ्रष्टाचार निराशा आणि अस्वस्थतेच्या वातावरणातून बाहेर काढून राज्याला प्रगतीपथावर आणले आहे. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस खाते सुद्धा उघडणार नाही, असा दावा ना. महाजन यांनी यावेळी केला.
प्रत्येक मतदार संघात भाजपाचे १२ हजार कार्यकर्ते काम करीत आहे. मोदींच्या काळात ३७० कलम रद्द केले, तलाकसह अनेक कायदे बदल केले असून जनतेच्या हिताचे राजकारण सरकारने केले आहे. ज्या-ज्या ठिकाणी मोदी गेले, तिथे त्यांचे भव्य स्वागत झाले. परदेश दौरे हे देश हितासाठी होते. त्यांच्या ३७० कलम हटवण्याच्या निर्णयाचे अमेरिकेनेही स्वागत केले आहे. मी स्वतः फिरतो, एकटा फिरतो आणि मतदार संघाची पाहणी करून अंदाज बांधून भाष्य करतो. मी ज्योतिषी नाही, माझा विश्वास कर्तृत्वावर आहे. ठेकेदारांच्या अडचणीमुळे काही ठिकाणी रस्त्यांची कामे रखडली आहेत मात्र अनेक ठिकाणी कामे पुन्हा सुरु झाली आहेत. जळगावातील समांतर रस्त्यांचेही काम सुरु झाले आहे. लोडशेडिंग विजेचा प्रश्न मार्गी लावला आहे, सिंचनाची कामे होत आहेत.
भाजपाच्या काही इच्छुकांनी बंडखोरी केली आहे ? या प्रश्नावर ना. महाजन म्हणाले की, भाजपात कुणीही बंडखोर नाही. मात्र जो असेल त्यावर पक्ष कारवाई करेल. कर्जमाफीच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका वेगळी आहे. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. अनेकजण कर्जमुक्त झाले आहेत, सगळ्यात महत्त्वाचा निर्णय हा ३७०चा आहे, हा देशाचा प्रश्न आहे, ३७०च्या बाबतीत संपूर्ण देश एक आहे, हे विरोधकांना आता या निवडणुकीत कळेल, असेही ते म्हणाले. यावेळी आ. राजूमामा भोळे, जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते.