काँग्रेस-राष्ट्रवादीने वंचितच्या उमेदवारांना पळवले – प्रकाश आंबेडकर

अकोला ।  राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे उमेदवार नसल्यानं त्यांनी डॉ. यशपाल भिंगे आणि अनिरूध्द वनकर या आमच्या दोन्ही उमेदवारांना  पळविल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. 

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं राज्यपालांकडे 12 नावे मंजूरीसाठी पाठविली आहेत. यात काँग्रेसच्या कोट्यातून कलाकार आणि गायक अनिरूध्द वनकर आणि राष्ट्रवादीकडून प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांची नावे सुचविण्यात आली आहेत. हे दोन्ही नेते वंचित बहूजन आघाडीकडून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढले आहेत. प्रा. डॉ. यशपाल भिंगे वंचितकडून नांदेडमधून लोकसभा लढले होते.  त्यांच्यामुळेच नांदेडमधून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा पराभव झाला होता. तर गायक आणि कलाकार अनिरूध्द वनकर यांनी चंद्रपूर या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदार संघासाठी विधानसभा लढवली होती.

आज अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी याबाबत टीकास्त्र सोडले आहे.  राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे उमेदवार नसल्यानं त्यांनी डॉ. यशपाल भिंगे आणि अनिरूध्द वनकर या आमच्या दोन्ही उमेदवारांना  पळविल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. या दोन्ही कार्यकर्त्यांच्या  जाण्यानं ना पक्षाला खिंडार पडलं, ना पक्षाचं नुकसान झालं हे आंबेडकरांनी स्पष्ट केलं.  दरम्यान, मंदिरं न उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर आज प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.

 

 

Protected Content