कंपनी कामगाराचा पाण्यात बुडुन मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील एमआयडीसी परिसरातील मीनाक्षी कंपनीत काम करीत असताना एका कामगाराचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला. हि घटना सोमवार १८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेला उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गणेश वसंत सोनार (वय २९, साई नगर, जळगाव) असे मयत कामगाराचे नाव आहे. तो आई, वडील, २ भाऊ यांच्यासह राहत होता. साधारण १ वर्षांपासून तो जळगाव एमआयडिसीतील ए- सेक्टरमधील मिनाक्षी या कंपनीत कामाला लागला होता. सोमवारी १८ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता कंपनीत असताना त्याला अचानक फिट आले व तो पाण्यात पडला, अशी माहिती कामगारांनी दिली. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी कंपनीतल्या कामगारांनी आणले असता, त्याला वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषित केले.

यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच, कुटुंबीय व कामगारांकडून माहिती जाणून घेतली. घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोहेकॉ रामकृष्ण पाटील यांनी प्राथमिक तपास केला. पुढील तपास सफौ विजय पाटील करीत आहेत.

Protected Content