बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वीज ही अत्यावशक गरज असूनही ग्राहक वीजबिल भरण्याला शेवटचे प्राधान्य देत असल्यामुळे परिमंडळाअंतर्गत घरगुती ,वाणिज्यिक,औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील ग्राहकांकडे अजूनही मार्च २०२५ अखेर ११९ कोटीचे थकीत असलेले वीजबिल महावितरणची आर्थीक समस्या वाढविणारे आहे.त्यामुळे थकीत वीजबिल आणि एप्रिल महिन्याचे १२४ कोटी रूपयाचे चालू वीजबिल वसुल करण्यासाठी मार्च महिण्याप्रमाणेच धडक मोहिम राबवा, वीजबिल न भरणाऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करा, असे स्पष्ट निर्देश मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिले आहे.
महावितरणनही वीज ग्राहकांप्रमाणेच वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्याची एक ग्राहक आहे.त्यामुळे प्रत्येक महिन्याचे वीजबिल १००% वसुली होणे अपेक्षीत आहे.परंतू तसे होत नसल्याने महावितरणकडून आता प्रत्येक महिन्याला धडक मोहिम राबविण्यात येणार आहे.वीज बिल भरले नाही तर त्या ग्राहकाचा वीज पुरवठा तत्काळ खंडित करण्यात येणार आहे आणि थकबाकीसह संपूर्ण वीजबिल आणि (सिंगल फेज साठी ३१० रूपये आणि थ्री फेजसाठी ५२० रूपये अधिक जी.एस.टी ) पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय त्या ग्राहकाचा वीज पुरवठा पुर्ववत केला जाणार नाही.
अकोला परिमंडळाअंतर्गत चालू वीजबिलासह मार्च अखेर असलेल्या थकबाकीमध्ये अकोला जिल्ह्याची मार्च अखेरची थकबाकी ३७ कोटी असून ५३ कोटी २२ लाखाचे चालू महिन्याचे वीजबिल आहे. बुलडाणा जिल्ह्याकडे मार्च अखेरची थकबाकी ६३ कोटीची असून चालू बिलाचे ४९ कोटी मिळून या महिन्यात एकुण ११२ कोटी वसुल करण्यासाठी,तसेच वाशीम जिल्ह्यात मार्च अखेरची थकबाकी १९ कोटी ४७ लाख आणि चालू वीजबिलाचे २१ कोटी ६० लाख वसुल करायचे असल्याने महावितरणने परिमंडळात विभागनिहाय मोहिमेचे नियोजन केले आहे.
तथापि एप्रिल महिन्याचे १६ दिवस संपूनही एकुण थकबाकीच्या केवळ १७ % म्हणजेच ४१ कोटी ४० लाख रूपयेच वसूल झाले आहे.त्यामुळे आगामी दिवसासाठी महावितरणकडून अधिक तीव्रपणे वसूलीला गती देण्यात आली आहे. वीज ग्राहकांनी वाद न घालता महावितरणची कटू कारवाई टाळण्यासाठी वीजबिल भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.