मुंबई- राज्यातील शाळा आणि मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळं सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 22 ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृह सुरु होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर आता राज्य सरकारनं महत्वाचे निर्णय घ्यायला सुरुवात केलीय. त्यानुसार राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे. यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल.
आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली.