भारतात आयात होणाऱ्या औषध घटकांच्या किमती चीनने वाढवल्या

 

मुंबई : वृत्तसंस्था । मोदी सरकारने आत्मनिर्भर भारतचा नारा दिला असला तरी भारत अजूनही चीनमधून येणाऱ्या अनेक वस्तूंवर अवलंबून आहे. आता पहिली परीक्षा भारताला द्यावी लागणार आहे. औषधे बनवण्यासाठी आवश्यक ‘की स्टार्टिंग मटेरियल’चे दर चीनने १०-२० टक्क्यांनी वाढवले आहेत. की स्टार्टिंग मटेरियल आणि सक्रिय औषधी घटक भारतात अँटीबायोटिक्स, स्टिरॉइड्स आणि इतर औषधे बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. विशेषतः ही आयात चीनमधून होते.

चीनने किंमती वाढवल्यामुळे भारतीय कंपन्यांना फटका बसणार आहे. कच्चा माल महागल्यामुळे उत्पादनाची किंमतही महाग होऊ शकते. भारतीय फार्मा क्षेत्र आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल करत आहे, याला ब्रेक लावण्यासाठी चीनने ही चाल खेळली असल्याची चर्चा आहे.

आयात होणाऱ्या केएसएमची किंमत वाढल्यामुळे भारतातील औषध निर्मितीवर याचा मोठा परिणाम होईल. जगभरात चीनच्या एपीआयची निर्यात मोठ्या प्रमाणात होते आणि भारतही याला अपवाद नाही. सध्या केएसएम आणि एपीआयसाठी भारत चीनवर अवलंबून आहे. ७० ते ८० टक्के मुलभूत कच्चा माल औषध बनवण्यासाठी चीनमधून आयात केला जातो.

अत्यावश्यक असलेल्या सेफालोस्पोरिन्स, अझिथ्रोमीसिन आणि पेनिसिलिन यांसारख्या अँटीबायोटिक्ससाठी भारत चीनवर ९० टक्के अवलंबून आहे. देशांतर्गत निर्मितीसाठी केंद्र सरकारने ५० एपीआयच्या निर्मितीवर सवलत जाहीर केली आहे. या एपीआयसाठी भारत चीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.

सर्वसाधारणपणे केएसएम आणि एपीआयची वाढ ही चक्रीय असते पण यावर्षी ही वाढ झाली नाही आणि यामुळेच सर्वांच्या भुवया उंचावल्या आणि धास्तीही निर्माण झाली होती. जाणकारांच्या मते, ‘चीनने केलेली वाढ ही आर्थिक गणिते लक्षात घेऊन केलेली आहे.’ केंद्र सरकारने उत्पादन केंद्रीत वित्तीय सहाय्य देण्यासाठी योजना आणली आहे. पण यासाठी मोठमोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक करण्याची गरज आहे. गुंतवणूक न झाल्यास भारताची चिंता वाढू शकते, असं जाणकार सांगतात.

Protected Content